कुडाळ वनपरिक्षेत्रच्या रेस्क्यू टिमची यशस्वी कामगिरी..
कुडाळ :
वेंगुर्ले तालुक्यातील आडारी भेंडमळा येथील श्री जयराम गावडे यांच्या मालकीच्या कोरड्या विहिरीत पडलेल्या वन्यप्राणी” कोल्हा”याला वन विभागाच्या कुडाळ वनपरिक्षेत्रच्या रेस्क्यू टिमने सुखरूप बाहेर काढले. यानंतर त्याची आरोग्य तपासणी करून वनअधिवासात सोडण्यात आले अशी माहिती कुडाळ वनक्षेत्रात श्री संदीप कुंभार यांनी दिली आहे.
आडारी भेंडमळा येथील जयराम गावडे यांच्या कोरड्या विहिरीत एक कोल्हा पडला असल्याची माहिती वेंगुर्ला येथील वनाधिकारी यांना दूरध्वनी द्वारे मिळाली. त्यानंतर कुडाळ वनपरिक्षेत्र ची” रेस्कू टीम” घटनास्थळाचे ठिकाणी पोहोचली. त्यानी स्थानिकांच्या मदतीने बचाव कार्य सुरु केले परंतु विहीर कोरडी असलेने व आकाराने १० फुटव्यासाची व अंदाजे ३० ते ४० फुट खोल आणि पूर्णतः जीर्ण झाली असलेने पडझड होऊन वन्यप्राणी जखमी होण्याची शक्यता दाट असल्याने बचावकार्यात अडथळा येत होता. याठिकाणी कुडाळ वनक्षेत्रपाल श्री संदीप कुंभार, मठ येथील वनपाल श्री सावळा कांबळे, तुळस वनरक्षक श्री विष्णू नरळे, श्री राहुल मयेकर, वाहनचालक यांनी स्थानिक नागरिक श्री राधाकृष्ण पेडणेकर, श्री हेमंत आडारकर, श्री कौस्तुब गावडे, श्री वामन पेडणेकर, श्री रमेश नार्वेकर, श्री वसंत पेडणेकर, श्री बाबल गवंडे, अजित पेडणेकर यांच्या मदतीने व सुमारे दोन तासाच्या अथक परिश्रमा नंतर वन्यप्राणी कोल्हा सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले. तदनंतर पशुधन विकास अधिकारी वेंगुर्ला यांच्याकडून या कोल्ह्याची आरोग्य तपासणी केल्यावर त्याला सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.ही बचाव मोहीम सावंतवाडी वनविभागाचे उपवनसंरक्षक श्री नवकिशोर रेड्डी, उपवनसंरक्षक, सहायक वनसंरक्षक डॉ. श्री. सुनील लाड, वनविभाग सावंतवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वनक्षेत्रपाल कुडाळ यांनी सहकार्य दिलेल्या ग्रामस्थांचे आभार मानून प्रत्येक वन्यप्राणी यांचे अन्न साखळीतील महत्व वैशिष्ट्यपूर्ण असलेने अशा बचाव अभियानात नागरिकांनी सहकार्य करण्याचे तसेच अश्या वनक्षेत्रालगत असणाऱ्या विहिरी बंदिस्त करण्याचे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे.अशी माहिती कुडाळ वनक्षेत्रपाल श्री संदीप कुंभार यांनी दिली आहे.