खा. विनायक राऊत यांचा आरोप ः रत्नागिरी येथे मविआची जाहीर सभा..
⚡कणकवली ता.२८- राज्यातील महायुतीचे सरकार हे कोकणद्वेषी आहे. कोकणात उत्पादन होणाऱ्या काजूवर केंद्र सरकराने निर्यातबंदी लागू केली. आफ्रिकन देशांतील काजूला आयात करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली. त्यामुळे कोकणातील काजू उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. सिडकोच्या माध्यमातून राज्यातील महायुतीचे ब्रह्मराक्षसी सरकार कोकणातील जमिनी हडप करू पाहत आहे, असा गंभीर आरोप रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील मविआचे उमेदवार तथा खासदार विनायक राऊत यांनी केला.
विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ मविआतर्फे रत्नागिरी येथे आयोजित केलेल्या जाहीरसभेत श्री. राऊत बोलत होते. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, आमदार भास्कर जाधव, राजन साळवी, उद्धव ठाकरे यांचे स्वीयसहाय्यक मिलिंद नार्वेकर यांच्यासह मविआचे नेते, पदाधिकारी उपस्थित होते.
राऊत म्हणाले, कोकणाला वैभव व संस्कृती लाभली आहे. मागील 10 वर्षांत या वैभव व संस्कृतीला डाग लागले असे कोणतेही काम आपण केले नाही. संसदेच्या अधिवेशनात कोकणातील प्रश्न व समस्या मांडण्याचे काम केले. रत्नागिरी-सिंधुदुर्गचा विकास करण्याची क्षमता शिवसेनेत आहे. मातोश्री व ठाकरे कुटुंबीय माझे दैवत आहे. त्यामुळे मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मातोश्री व ठाकरे कुटुंबीयांच्या निष्ठावंत राहणार आहे. शिवसेना व कोकणवासीयांमुळे मी दोन वेळा खासदार होऊ शकलो. मी मातोश्री व कोकणाचा सेवक आहे. या सेवकाला तुमच्या हक्काचा खासदार पुन्हा एकदा निवडून द्यावे, असे आवाहन राऊतांनी केले. मोदी सरकार, राणे, महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल राऊतांनी केला.
