मालवण दि प्रतिनिधी :
भारताच्या अखंडतेचा, राष्ट्रप्रेमाचा आणि देशभक्तीचा संदेश जनमानसात पोहोचविण्याच्या उद्देशाने विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांच्यावतीने ‘अखंड भारत, समर्थ भारत’ या संकल्पनेवर आधारित भव्य टु-व्हीलर तिरंगा रॅली आयोजित करण्यात आली. हातात अभिमानाने तिरंगा घेऊन मोठ्या संख्येने नागरिक, नगरपरिषद या सर्वांच्या सहभागामुळे मालवण शहरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले.
‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ अशा घोषणांनी रॅलीचा मार्ग दुमदुमून गेला. भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले; मात्र भारताचे विभाजन होऊन मिळालेले हे स्वातंत्र्य असल्याची भावना राष्ट्रप्रेमी नागरिकांच्या मनात आजही आहे. अखंड भारताची संकल्पना, देशाची एकात्मता आणि राष्ट्रप्रेमाची भावना नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्या साठी या रॅलीचे आयोजन करण्यात आले. अखंड भारताचे स्वप्न आणि राष्ट्राच्या सामर्थ्याचा सामूहिक संकल्प नागरिकांमध्ये जागृत करण्याचा संदेश या माध्यमातून देण्यात आला.
नगराध्यक्षा ममता वराडकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून रॅलीचे उद्घाटन करण्यात आले. मालवण एस.टी. बसस्थानक येथून रॅलीला प्रारंभ झाला. त्यानंतर भरड, बाजारपेठ, देऊळवाडा, कुंभारमाठ मार्गे रॅली मार्गस्थ होत हुतात्मा स्मारक येथे तिचा समारोप करण्यात आला. जेष्ठ संघ स्वयंसेवक पुखराज पुरोहित यांनी यावेळी ज्वलंत विचार मांडले. रॅलीमध्ये सहभागी नागरिकांनी आपल्या दुचाकींवर तिरंगा ध्वज फडकवत राष्ट्रभक्तीचा जागर केला.
यावेळी विश्व हिंदू परिषद मालवणचे अध्यक्ष भाऊ सामंत, मालवण नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, लोकप्रतिनिधी, विविध पक्षांचे पदाधिकारी तसेच राष्ट्रप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
विश्व हिंदू परिषद मालवणचे अध्यक्ष भाऊ सामंत यांनी अनेक दशकांची स्वप्ने सामूहिक इच्छाशक्तीने साकार अयोध्ये तील श्रीराम मंदिर उभारणीचे स्वप्न राष्ट्रभक्त नागरिकांनी अनेक वर्षे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जपले. त्याचप्रमाणे जम्मू-काश्मीरसंदर्भातील कलम ३७० रद्द करण्याचे स्वप्नही अनेक दशकांपासून देशवासीयांच्या मनात होते. जनतेच्या सामूहिक इच्छाशक्तीमुळे ही दोन्ही स्वप्ने प्रत्यक्षात साकार होताना देशाने पाहिली आहे. त्याच धर्तीवर अखंड भारताचे स्वप्नही जनतेच्या प्रभावी सहभागातून आणि सामूहिक संकल्पातून भविष्यात साकार होईल असा विश्वास व्यक्त केला.
