जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांची मागणी ः महायुतीचा उमेदवार विजयी होणार..
⚡कणकवली ता.०८-: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील मतदारांची नाळ धनुष्यबाण चिन्हाशी जुळलेली आहे. त्यामुळे या मतदारसंघातील महायुतीचा उमेदवार शिवसेनेचा हवा, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांनी केली.
येथील शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत श्री. आग्रे बोलत होते. यावेळी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष वर्षा कुडाळकर, भास्कर राणे, तालुकाप्रमुख भूषण परुळेकर, शेखर राणे, सुनील पारकर, प्रमोद मसुरकर व इतर उपस्थित होते.
श्री. आग्रे म्हणाले, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन मंगळवारी करण्यात येणार आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे या मतदारसंघातील महायुतीचा उमेदवार शिवसेनेचा असावा, अशी शिवसैनिकांची मागणी आहे. या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी किरण उर्फ भैय्या सामंत हे इच्छुक आहेत. त्यामुळे त्यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
खासदार विनायक राऊत यांनी मागील 10 वर्षांत मतदारसंघात काहीच विकासात्मक काम केले नाही. कोकणात आलेल्या प्रकल्पांना त्यांनी केवळ विरोधच केला. शिवसेनेकडून इच्छूक असलेले किरण सामंत यांना उमेदवारी मिळावी, अशी शिवसैनिकांची आग्रही मागणी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार जो महायुतीचा उमेदवार म्हणून देतील, त्याला अडीज लाखांच्या मताधिक्क्याने विजयी करणार असल्याचे आग्रे यांनी सांगितले.
वर्षा कुडाळकर म्हणल्या, शिवसेना महिला आघाडीच्या माध्यमातून सर्व तालुक्यांत प्राचार काम सुरू आहे. आम्ही गावोगावी बैठका घेत आहोत. हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याने सेनेला उमेदवारी द्यावी, हा आमचा आग्रह आहे. मात्र, महायुतीचा जो कोणी उमेदवार असेल त्याचा आम्ही जोरदार प्रचार करून निवडून देखील आणणार असल्याचे त्यांनी सांगितले
