⚡सावंतवाडी ता.२७-: माडखोल येथील धरणात आंघोळीसाठी उतरलेला युवक बुधवारी सायंकाळी बुडाला. अक्षय सद्गुरू चव्हाण (वय २८, रा. कुणकेरी-परसदळावाडी) असे त्याचे नाव आहे.घटनास्थळी पोलिसांनी दाखल होत बाबल आल्मेडा टीमच्या मदतीने मृतदेह धरणातून बाहेर काढला. अक्षय याच्या अकाली जाण्याने गावात शोककळा पसरली आहे.
माडखोल येथे लघू पाटबंधारे विभागाचे धरण आहे. याठिकाणी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास अक्षय आपल्या सख्या चुलत भांवडासह आंघोळीसाठी गेला होता. त्यांने धरण्यात आंघोळीसाठी उडी टाकल्यानंतर तो बराच वेळ वर आला नाही म्हणून सोबत असलेल्या भावंडानी पाण्यात शोधाशोध केली मात्र तो सापडत नसल्याने त्याने याबाबत शेजारच्याना कल्पना दिली. त्यानंतर अनेकांनी घटनास्थळी धाव घेत धरणाच्या पाण्यात शोधाशोध सुरु केली. दरम्यान सावंतवाडी पोलिसांना पोलिसांना याबाबत माहीती मिळताच पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी पोहचले. धरणातील पाणी आणि आतमध्ये असलेला चिखल लक्षात घेता पोलिसांनी बाबल आल्मेडा टिमला शोधकार्यासाठी पाचारण केले. त्यानंतर तेथे काही वेळाने आलेल्या बाबल आल्मेडा टीमने धरणात उतरुन शोधकार्य हाती घेतले बर्याच वेळानंतर मृतदेह शोधून तो बाहेर काढण्यास त्यांना यश आले. यावेळी ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. दरम्यान घटनास्थळाचा पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला.
अक्षय हा गोव्यात खाजगी कंपनीत कामाला होता. त्याचा मित्र परिवार मोठा होता शिवाय सर्वामध्ये मिळून मिसळून राहत असल्याने त्यांच्या अशा अकाली जाण्याने हळहळ व्यक्त होत आहे. पश्चात मोठा भाऊ, आई वडील असा परिवार आहे.
