मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामाला गती द्या !

कणकवलीत पत्रकारांनी निवेदनाद्वारे वेधले शासनाचे लक्ष

⚡कणकवली ता.०९-: मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरण कामाला एक तप उलटूनही रत्नागिरी, रायगड जिल्हयामध्ये हे काम अपूर्ण आहे. परिणामी ठिककिकाणी महामार्गाची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. या पार्श्वभूमीवर 9 ऑगस्ट या क्रांतीदिनाचे औचित्य साधून रायगड मधील पत्रकारांनी याबाबत आंदोलन पुकारले होते. या आंदोलनास महाराष्ट्र पत्रकार परिषदेने पुर्णपणे पाठिंबा देत केलेल्या आवाहनानूसार रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हयातील पत्रकारांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला. त्यानूसार सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ आणि तालुका पत्रकार समिती यांच्यावतीने कणकवलीत नायब तहसिलदार गौरी कट्टे यांना तर जिल्हा पत्रकार संघाच्यावतीने प्रांताधिकारी जगदीश कातकर यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष रमेश जोगळे, कणकवली तालुका पत्रकार समितीचे अध्यक्ष अजित सावंत, ज्येष्ठ पत्रकार संतोष वायंगणकर, भाई चव्हाण, जिल्हा पत्रकार संघाचे कार्यकारिणी सदस्य संतोष राऊळ, कणकवली तालुका पत्रकार समितीचे सचिव माणिक सावंत, उपाध्यक्ष दिगंबर वालावलकर, खजिनदार योगेश गोडवे, पत्रकार लक्ष्मीकांत भावे, सुधीर राणे, भगवान लोके, चंद्रशेखर देसाई, नंदकिशोर कोरगावकर, उमेश बुचडे, भास्कर रासम, विराज गोसावी, राजन चव्हाण, दर्शन सावंत आदी पत्रकार उपस्थित होते. मुंबई-गोवा महामार्ग हा कोकणच्या विकासाचा महत्वाचा दुवा आहे. मुंबईकर चाकरमानी, पर्यटक आणि कोकणवासियांसाठी हा महामार्ग लवकरात लवकर पुर्ण होणे आवश्यक आहे. प्रशासनाने पत्रकारांच्या भावना शासनापर्यंत पोहोचवून महामार्गाचे रखडलेले काम पुर्णत्वास न्यावे अशी अपेक्षा कणकवली तालुका पत्रकार समितीचे अध्यक्ष अजित सावंत आणि जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष रमेश जोगळे यांनी व्यक्त केली.

You cannot copy content of this page