आंबोलीतील विशेष ग्रामसभेत एकमुखी ठराव
आंबोली, ता.९: कबुलायतदार प्रश्नी घेण्यात आलेल्या ग्रामसभेला आज १५५ पेक्षा जास्त लोकांनी सहभाग दर्शवून ग्रामसभेच्या ठरावाप्रमाणेच इथल्या जमिनीचे वाटप आणि निर्णय घेण्यात यावा अशी मागणी एकमुखाने ग्रामस्थांनी केली.तसा ठराव घेऊन तो शासनाकडे पाठवण्यात येणार आहे. आंबोली ग्रामपंचायत मध्ये आज खास ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती.यावेळी ग्रामपंचायत सरपंच सावित्री पालेकर,उप सरपंच दत्तू नार्वेकर,सर्व सदस्य, पोलीस पाटील विद्या चव्हाण,ग्रामसेवक श्री.गोसावी,कबुलायतदार गावकर समिती अध्यक्ष शशीकांत गावडे,उपाध्यक्ष उल्हास गावडे, सचिव भारतभूषण गावडे,तसेच १५५ पेक्षा जास्त लोक उपस्थित होते. यावेळी ग्रामपंचायत आंबोली ने शासनाकडे ग्रामसभेचा जो ठराव दिला आहे त्यानुसारच जमीन वाटप करावे तसा निर्णय घेण्यात यावा. खाजगी वने स्वरूपाची जमीन ही फेरफाराने शेती केली जाते.सद्य स्थितीत त्या ठिकाणी वन विभागाच्या आडकाठीने जाऊ शकत नाही त्यामुळे वहिवाट दिसत नाही त्यामुळे बैठक घेऊन निर्णय व्हावा.तसेच वाहिवाटदार म्हणून नावे लागावी व २२ अ’ ची चौकशी व्हावी. इथल्या जमिनी या भोगवटदार वर्ग १ च्याच जमिनी म्हणून मिळाव्यात. कुटुंब यादी ही ग्रामसभेने दिल्याप्रमाणेच वाटप व्हावे.५ जानेवारी २०१९ च्या दिलेल्या ग्रामसभेच्या ठरावानुसार जमिन क्षेत्राची वाटणी करण्यात यावी.शासनाने ग्रामसभेनुसार गावातील लोकांनी ठरवल्यानुसारच शासन निर्णय करून तसा जी आर (अद्यादेश) करावा असा एकमुखी ठराव आजच्या ग्रामसभेत घेण्यात आला.
