⚡कणकवली ता.०१-: आयुष्यात संगत आणि सल्लागार चांगले पाहीजेत. जर संगत चांगली लाभली तर बेस्ट व्हाल नाहीतर वेस्ट व्हाल त्यामुळे संगत कोणाची करायची हे शालेय जीवनापासून ठरवले पाहिजे. तुम्ही स्वतःची ताकद ओळखली तरच तुम्ही मोठे व्हाल असे माजी आमदार प्रमोद प्रमोद जठार यांनी सांगितले.
कासार्डे माध्यमिक विद्यालयाच्या सभागृहात सुनिता शांताराम एज्युकेशन ट्रस्ट, संजय नकाशे मित्रपरिवार व गुणवंत विद्यार्थी समितीच्या वतीने आम्ही भाग्यवंत, गुणांचे पुजारी या दहावी बारावी गुणवंत विद्यार्थी सत्कार कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.
कार्यक्रमाची सुरुवात प्रमोद जठार याच्या हस्ते करण्यात आली. यावेळी भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रसाद देवधर, पत्रकार गणेश जेठे, वैभववाडी गटविकास अधिकारी जयप्रकाश परब, कासार्डे सरपंच निशा नकाशे, उपसरपंच गणेश पाताडे,आयोजक संजय नकाशे, मुख्याध्यापक मधुकर खाडये, ग्रा.पं. सदस्य रिध्दी मुणगेकर, संस्था प्रतिनिधी रविंद्र पाताडे, दादा पाताडे, शिडवणे सरपंच रविंद्र शेटये, तंटामुक्त अध्यक्ष राजकुमार पाताडे, प्रसाद जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रमोद जठार म्हणाले, शालेय जीवनापासून प्रचंड मेहनत करा यासाठी आपल्या मनावर आपणच ताबा मिळवला पाहिजे. आज तुम्ही गुणवंत झालात म्हणजे यशा चाखले असे नाही. कारण पुढे जाऊन तुम्हाला यशवंत व्हायचे आहे.जेव्हा तुम्ही यशवंत व्हाल त्यानंतर किर्तीवंत होण्याचा प्रयत्न करा तरच आपला भारत देश मोठा होईल.
यावेळी बोलताना प्रसाद देवधर म्हणाले, आयुष्यात वाचन जास्तीत जास्त करा. आपल्याला कोणत्याही क्षेत्रात यश मिळवायचे असल्यास कष्टाशिवाय पर्याय नाही. मात्र ज्या दिवशी बापाकडून पैसे मागणे बंद कराल तो दिवस सोन्याचा असेल.
तर गणेश जेठे म्हणाले, आपण विकसनशील आहोत. देश हे आपले कुटुंब ही भावना प्रत्येकाने ठेवली पाहीजे. यासाठी देशाचे जबाबदार नागरीक व्हा. प्रामाणिक अभ्यास करून आपला देश नेहमीच पुढे असा जाईल यासाठी आपणच प्रयत्न केले पाहीजेत यासाठी स्वच्छतेचे व्रत आपण घेतले पाहीजे.
त्याचबरोबर गटविकास अधिकारी जयप्रकाश परब याच्यासह मधुकर खाडये, रविंद्र पाताडे यानी बहुमूल्य मार्गदर्शन करत कासार्डे माध्यमिक विद्यालयातील दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थी व उपस्थित मान्यवरांचे शाल,श्रीफळ व सुपारीचे रोप देऊन गौरविण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश उर्फ बाबू तिर्लोटकर यानी केले.
