अर्चना घारे याची मंत्री केसरकरावर टिका; सावंतवाडीकरांच्या मनात राजघराण्याला वेगळ स्थान
⚡सावंतवाडी ता.०९-: येथोल संस्थांनच्या राजघराण्याला एक वेगळे स्थान आहे. मात्र असे असतांना सावंतवाडीतील मुख्यमंत्र्यांच्या नागरी सत्कारासाठी मंत्री दिपक केसरकर यांनी युवराज्यांना पुढे करुन व्यासपिठावर त्यांना दुसऱ्या रांगेत बसविणे हे कितपत योग्य, केवळ आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी त्यांनी युवरांना बोलावले अशी टिका राष्ट्रवादीच्या कोकण विभागीय महिला अध्यक्ष अर्चना घारे परब यांनी केली.
श्री घारे परब यांनी याबाबत पत्रक प्रसिद्धीस दिले असून त्यात असे म्हटले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सावंतवाडी शहरातील विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी संस्थानचे युवराज लखम राजे भोसले यांच्या हस्ते त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला परंतु शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी युवराजांना दुसऱ्या रांगेत बसवले हे संयुक्तिक वाटले नाही. सावंतवाडी संस्थानाचा इतिहास, काम पाहता आजच्या लोकशाहीतही राज घराण्याला एक वेगळे स्थान सावंतवाडीकरांच्या मानत आहे. सावंतवाडीचा मानबिंदू म्हणुनच त्यांच्या हस्ते मुख्यमत्र्यांचा नागरी सत्कार करण्यात आला. मग राजकारणाचा आदर्श आणि परंपरा लक्षात घेता लखम राजे यांना पहिल्या रांगेत बसवणे गरजेचे होते. मात्र तसे झाले नाही त्यामुळे मनाला वेदना होत आहे.
दीपक केसरकर हे मुरब्बी राजकारणी आहेत अनेक वर्षे ते सावंतवाडी शहराच्या माध्यमातून राजकारणात आणि समाजकारणात यशस्वी झाले आहेत. आपल्या प्रत्येक भाषणात ते सावंतवाडी संस्थानाचा व राजघराण्याचा उल्लेख करतात, मात्र कालच्या कार्यक्रमात त्यांनी केवळ आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी युवराज यांना बोलावले त्यांच्या हस्ते मुख्यमंत्र्याचा सन्मान केला परंतु त्यांना यथोचित मानसन्मान दिला नाही हे चुकीचे आहे.
