आमदार वैभव नाईक यांचे जोरदार टीकास्त्र
⚡कुडाळ ता.०५-: कुडाळमध्ये उद्या ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम होत असून यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत. या अनुषंगाने आज पत्रकारांनी उद्धव ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांना विचारले असता ते म्हणाले की, हा कार्यक्रम नारायण राणे यांनी आपल्या मुलाला निवडणुकीत पुढे आणण्यासाठी केला आहे. यापूर्वी येथील जनतेने त्यांचा पराभव केला आहे, अशी टीकाही केली.
तर केसरकर नेहमीच स्वाभिमानाच्या गप्पा सांगतात. पण हा जाहीर केलेला कार्यक्रम केसरकरांकडून हिसकावून आणला आहे. त्यामुळे केसरकरांची सावंतवाडीतील जनता काय म्हणते? त्याला केसरकर काय उत्तर देतात, हे पाहावे लागेल. तसेच शिंदे गट हा भाजपच्या ताटाखालील मांजर आहे. शिवसेनेत फूट पाडण्यासाठी हे सर्व करण्यात आले असून येत्या काळात भाजपचे कार्यकर्ते किंवा नेते शिंदे गटाच्या उमेदवाराचा पराभव करतील, अशी टीका सुद्धा आमदार वैभव नाईक यांनी केली.
नारायण राणे, केसरकर आणि उदय सामंत यांनी पक्षाशी आणि जनतेशी बेइमानी केली आहे. या सर्वांनी स्वतःच्या स्वार्था साठी यांनी पक्ष बदलेले आहेत. हे सर्व एकत्र आले तरी येथील स्वाभिमानी जनता निष्ठावंतांच्या पाठीशी राहील. त्यामुळे ही जनता उद्धव ठाकरे आणि माझ्या पाठीशी राहील, असा विश्वास सुद्धा आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त केला.
