जागतिक प्रेम दिवस “गाईला आलिंगन दिन” म्हणून होणार साजरा

१४ फेब्रुवारी रोजी आयोजन;केंद्र सरकारचे आदेश

ओरोस ता.०९-:

१४ फेब्रुवारी हा ‘व्हॅलेंटाईन डे’ अर्थात जागतिक प्रेमदिन म्हणन सर्वत्र साजरा केला जातो. मात्र, केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय मंत्रालयाने सल्ला देत १४ फेब्रुवारी हा दिवस ‘काऊ हग डे’ अर्थात ‘गाईला आलिंगन दिन’ म्हणजेच गाईला मिठी मारून साजरा करण्याचे निर्देश दिले आहे. तसे पत्रदेखील या विभागाच्या वतीने काढण्यात आले आहे.
जागतिक प्रेमदिन म्हणून १४ फेब्रुवारी हा सर्वांना चांगला ठाऊक आहे. हा दिवस संपूर्ण जगात आणि भारतातही साजरा केला जातो. मात्र, भारतात प्रेमदिनाला कायमच विरोध होतो. केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्य व्यवसाय मंत्रालयाचे सचिव डॉ.एस.के.दत्ता यांनी एक पत्र काढून १४ फेब्रुवारी हा ‘काऊ हग डे’ अर्थात गाईला मिठी मारून साजरा करण्याचे निर्देश दिले आहेत. या पत्रात दत्ता यांनी म्हटले आहे की, गाय ही भारतीय संस्कृती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. गाय ही आपले जीवन टिकवते, पशुधन आणि जैवविविधतेचे प्रतिनिधित्व करते.
मानवतेला सर्व ऐश्वर्य प्रदान करणारी गाय असते. आईसारख्या प्रेमळ स्वभावामुळे गायीला ‘कामधेनू’ आणि ‘गोमाता’ म्हणून ओळखले जाते. काळानुसार पाश्चात्य संस्कृतीच्या प्रगतीमुळे वैदिक परंपरा जवळजवळ नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. पाश्चिमात्य संस्कृतीच्या झगमगाटाने आपली भौतिक संस्कृती आणि वारसा जवळजवळ आपण विसरत चाललो आहोत. गाईचा प्रचंड फायदा पाहता, गाईला मिठी मारल्याने भावनिक समृद्धी येते. त्यामुळे आपला वैयक्तिक आणि सामूहिक आनंद वाढतो. त्यामुळे सर्व गाईप्रेमींनी १४ फेब्रुवारी हा दिवस गाईचे महत्त्व लक्षात घेऊन गाईला आलिंगन दिन म्हणून साजरा करावा आणि जीवन आनंदी आणि सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण करावे, असे या पत्रात म्हटले आहे.

You cannot copy content of this page