वर्षपूर्ती निमित्त आयोजित पत्रकार परिषदेत अध्यक्ष मनीष दळवी यांची माहिती
⚡ओरोस ता.१३-: सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्यावर आपल्याला आज वर्ष होत आहे. या वर्षभरात केंद्रीयमंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संचालक आ नितेश राणे आणि उपाध्यक्ष, सर्व संचालक यांच्या सहकार्याने आपली जिल्हा बँक राज्यातील पहिल्या क्रमांकाची बँक बनविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी केवळ शेतकरी यांच्या पुरती बँक मर्यादित न ठेवता व्यापारी, नव उद्योजक, तरुण वर्ग, महिलांची बँक म्हणून ओळख निर्माण करण्याचे काम गेल्या वर्षभरात वेगाने सुरू केले आहे, अशी माहिती जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी दिली.
सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा बँकेच्या प्रधान कार्यालयातील सभागृहात ही पत्रकार परिषद झाली. यावेळी संचालक निता राणे, संदीप सावंत, प्रकाश मोर्ये आदी उपस्थित होते. आपण जिल्हा बँक अध्यक्ष म्हणून तर अतुल काळसेकर यांनी उपाध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारल्यावर आज वर्ष होत आहे. या वर्षभरात जिल्हा बँकेने दुधाळ जनावरे, महिलांसाठी छोटे गृह उद्योग, पडीक जमीन विकास, शासकीय कर्मचारी, तरुण वर्ग, ई बँकिंग यासाठी पुढाकार घेण्यात आला. त्याला जिल्ह्यातील नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला, असे यावेळी त्यांनी सांगितले.
