सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाहनांना टोल माफीसाठी संघर्षाची तयारी
⚡कणकवली ता.१२-: जोपर्यंत महामार्गाचे काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत टोल आकारला जाऊ नये आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाहनांना टोल माफी व्हावी, अशी मागणी सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरु झाली आहे. व्हाट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून नागरिक एकत्र येत असून मुंबई गोवा मार्गावरील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या हद्दीतील ओसरगाव येथील टोल नाक्यावरून जिल्ह्यामध्ये आता सोशल मीडियावर प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
मुंबई गोवा मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अजूनही अर्धवट आहे. डिसेंबर २०२२ ही महामार्ग पूर्ण करण्याची डेडलाईन केंद्र सरकारने जाहीर केली होती.मात्र अजूनही या रस्त्याचे काम झालेला नाही,सिंधुदुर्ग जिल्ह्यात खारेपाटण ते झाराप असा चौपदरीकरणाचा मार्ग खुला झाला असला तरी अजूनही अनेक समस्या आहे.अपघाताच्या मालिका सुरू आहेत रस्त्याची दुरावस्था आहे. कणकवली शहरातील उड्डाणपुलाचा भाग कोसळल्यानंतर येथे पुलाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. या परिस्थितीमध्ये सध्या टोल वसुलीसाठी एका कंपनीला ठेका देण्यात आला आहे. त्याला राजकीय आणि सामाजिक स्तरावर सातत्याने विरोध होत आहे. टोल वसुली बाबतच्या तारखा सातत्याने पुढे ढकलल्या जात आहेत. परंतु तयारी पूर्ण झाली आहे पोलीस यंत्रणेने यासाठी संरक्षण देण्याची तयारी सुरू केली आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अजूनही निकृष्ट दर्जाचे आहे. मुळात सिंधुदुर्गातील जनतेला टोलमुक्ती मिळावी अशी मागणी आता लावून धरली जात आहे.सोशल मीडियावर यासाठी उठाव सुरु करण्यात आला आहे. लवकरच जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये राजकीय मंडळी एकत्रित येऊन संघर्ष समिती करण्याची तयारी सुरू झाली आहे. काही नागरिकांनी रस्त्यावरची लढाई लढण्याची तयारी सुरू केली आहे. तसेच केंद्रीय मंत्र्यांना निवेदने देऊन आंदोलनाची भूमिका ठरविली जाणार आहे .सध्या सोशल मीडियावर व्हाट्सॲपवर काही ग्रुप बनविण्यात आले आहेत.त्यात राजकीय पक्षांचे नेते, आमदार,पदाधिकारी,पत्रकार,
वकील, डॉक्टर आणि सामाजिक संघटना प्रतिनिधी यांचा समावेश आहे. पुढील काळात न्यायालयीन लढाई सोबतच रस्त्यावरही लढाई लढण्याची भूमिका या सोशल मीडियाच्या माध्यमातून केली जात आहे.
