दुचाकी व चारचाकी अपघतात दोन्ही गाड्यांचे नुकसान

⚡वेंगुर्ला ता.२०-: वेंगुर्ला शहरातील रामघाट रोड येथे गुरुवारी सकाळी ११ वाजण्याच्या दरम्यान दुचाकी व चारचाकीत अपघात होऊन तिघे दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले. या अपघातात दुचाकीचेही मोठे नुकसान झाले असून चारचाकीच्या दर्शनी भागाचे नुकसान झाले आहे. दरम्यान तिनही दुचाकीस्वार यांना अधिक उपचारासाठी गोवा-बांबुळी येथे नेण्यात आले असून यातील दोघाना गंभीर दुखापत झाली आहे.

  याबाबत सविस्तर माहिती अशी की, वेंगुर्ला येथून तुळसच्या दिशेने जाणा-या एमएच ०७ झेड ११३५ या दुचाकीचा तर वेंगुर्लाच्या दिशेने जाणा-या रामराजा सुरेश लामकाने यांच्या ताब्यातील एमएच ०७ एजी ७९०६ या चारचाकीची सामोरासमोर जोरदार धडक होऊन अपघात झाला. या अपघातात तुळस-गि-याचे गाळव येथील रहिवासी दशरथ दत्ताराम सावंत (६०), काशिनाथ भगवान सावंत (५५) व निळकंठ नारायण सावंत (६१) हे तिघेही जखमी झाले. यातील दशरथ व काशिनाथ यांच्या हात, पाय व डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. तर निळकंठ यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. तुळस-वडखोल येथील नातेवाईकांच्या अंत्यसंस्कारावरून हे तिघेही ट्रिपलसीट तुळस येथे जात होते. यातील दशरथ सावंत यांना तात्काळ १०८ रुग्णवाहिकेने गोवा बांबुळी येथे नेण्यात आले तर दुसरी रुग्णवाहिका तात्काळ उपलब्ध न झाल्याने काशिनाथ व निळकंठ यांना वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी घटनास्थळी पोलीस कॉन्स्टेबल भगवान चव्हाण, योगेश वेंगुर्लेकर, दादा परब व सराफदार यांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला.

  दरम्यान वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालयात अन्य दोन रुग्णांना गोवा बांबुळी येथे नेण्यासाठी तब्बल २ तास उलटून सुद्धा रुग्णवाहिका न मिळाल्याने येथे उपस्थित तुळस येथील लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत उपजिल्हा रुग्णालयाचा भोंगळ कारभार उघड केला. याठिकाणी दाखल करण्यात आलेल्या काशीनाथ सावंत यांच्या नाकातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत असल्याने त्यांना तात्काळ गोवा बांबुळी येथे हलवणे गरजेचे होते. मात्र उपजिल्हा रुग्णालयाची रुग्णवाहिका उपलब्ध असताना त्याला चालक नसल्याने तब्बल २ तास या रुग्णाची हेळसांड होत त्यांची तब्येत अधिक खालावली. तुळस सरपंच शंकर घारे, शिवसेना तालुकाप्रमुख यशवंत परब, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मकरंद परब यांच्यासहीत उपसरपंच जयवंत तुळसकर, सदस्य चंद्रे परब, सोसायटी चेअरमन संतोष शेटकर, शिवसेना विभाग प्रमुख संजय परब, ग्रामस्थ समीर तांबोसकर, निलेश नागवेकर व ग्रामस्थ आदी उपस्थित होते.
You cannot copy content of this page