⚡मालवण ता.२०-: वायरी जाधववाडी येथील अमित मायबा या मच्छीमाराने मासे पकडण्यासाठी समुद्रात टाकलेली सुमारे ७० हजार रुपये किंमतीची जाळी चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांत तक्रार देण्यात आलेली नाही. मात्र, यंदाच्या हंगामाच्या सुरुवातीपासून समुद्रात टाकलेली जाळी चोरीस जाण्याच्या घटना वाढल्या असल्याचे मच्छीमारांचे म्हणणे आहे.
मायबा यांनी सोमवारी ऐंशी क्रमांकाची सहा जाळी समुद्रात टाकली होती. रात्रीच्या वेळी ते जाळी ओढायला गेले असता, तेथे त्यांना एका अज्ञात नौकेचा संशयास्पद वावर आढळून आला. मायबा यांची नौका जाळ्यांच्या जवळ येत असल्याचे पाहून संबंधित नौकाधारकाने काळोखाचा फायदा घेऊन पोबारा केला. ऐन हंगामात जाळी चोरीस गेल्याने मायबा यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. मायबा यांची जाळी कुणास आढळून आल्यास ती मिळवून देण्यासाठी मच्छीमारांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा श्रमजीवी रापण संघाचे सचिव दिलीप घारे यांनी केले आहे.
