कोकणच्या साहित्यिकांसह मराठी लेखकांचे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना खुले पत्र
⚡कणकवली ता.१९-: लोकशाहीर काॅ. अण्णा भाऊ साठे यांचा, १ ऑगस्ट हा जन्म दिन, ” लेखन प्रेरणा दिन ” म्हणून घोषित करण्यात यावा अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एका खुल्या प्रदोरे कोकणच्या साहित्यिकांसह मराठी साहित्यिक, कलावंत आणि विचारवंत, सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.
साहित्यिक,कलावंत,सांस्कृतिक, सामाजिक संघटनांनी सदर मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली असून या मागणी करणाऱ्या संघटनांच्या प्रतिनिधींमध्ये अर्जुन डांगळे, डॉ. बाबुराव गुरव,उर्मिला पवार, डॉ. लक्ष्मीकांत देशमुख,डॉ यशवंत मनोहर, सुबोध मोरे, हिरा बनसोडे, डॉ. नागनाथ कोत्तापल्ले,
डॉ भारत पाटणकर, गणेश विसपुते, शाम गायकवाड, सुबोध मोरे, संध्या नरे पवार, डॉ प्रज्ञा दया पवार,प्रतिमा जोशी, रझिया पटेल, डॉ श्रीपाल सबनीस, डॉ अजीज नदाफ, राकेश वानखेडे, डॉ प्रतिभा अहिरे, डॉ माया पंडित, डॉ मेधा पानसरे,विश्वास पाटील, डॉ सिसिलिया कार्व्हालो,नीरजा, शफाअत खान, सदानंद देशमुख, महेश केळुस्कर, किशोर कदम, सुदाम राठोड, सत्यपाल रजपूत, निशा शेंडे, राहुल कोसंबी,डॉ दीपक बोरगावे,सारिका उबाळे,
आनंद विंगकर, सायमन मार्टिन, शाहीर संभाजी भगत,मंगेश काळे, प्रा.आशालता कांबळे,छाया कोरेगावकर,काॅ.प्रकाश रेड्डी,डॉ श्रीधर पवार, प्रा.रमेश कांबळे,डाॅ.अनिल सकपाळ,अविनाश गायकवाड,डाॅ.श्यामल गरुड,अभय कांता,येशू पाटील,इग्नेशिअस डायस,फिलिप डिसोझा,जयप्रकाश सावंत,राजन बावडेकर,सुरेश राघव,सुभाष थोरात,डाॅ.मनोहर जाधव,कविता मोरवणकर,प्रकाश घोडके,संतोष पवार,गोविंद गायकी,प्रभू राजगडकर,मिलिंद किर्ती,लोकनाथ यशवंत पार्थ पोळके,डाॅ.उदय नारकर,सुनील अवचार,किरण मोघे,लता भिसे,संपत देसाई,डॉ आदिनाथ इंगोले,डॉ राजेंद्र गोणारकर,डाॅ.महेबूब सय्यद,डाॅ.माधव सरकुंडे,उषा अत्राम,डाॅ.कुंदा प्र.नी. प्रा.शोभा बागुल, अजय कांडर, अविनाश उषा वसंत,साहिल कबीर,मधुकर मातोंडकर, डाॅ.मारूती कसाब,डाॅ.रणधीर शिंदे,प्रा.प्रकाश नाईक, राजीव देशपांडे,अर्जुन जगधने,अंकूश कदम,श्रीधर चैतन्य, शंकर बळी,युवराज बावा, शैलेंद्र कांबळे, सुनील कदम, दीपक पवार, राजानंद सुराडकर,
मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात सदर साहित्यिकांनी म्हटले आहे की देशात ५ सप्टेंबर हा डॉ. राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचा १५ऑक्टोबर हा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. ११ नोव्हेंबर हा मौलाना अबुल कलाम आझाद यांचा जन्मदिवस शिक्षण दिन म्हणून साजरा केला जातो. तर ३ जानेवारी हा सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस बालिका दिवस म्हणून साजरा केला जातो. दि. २७ फेब्रुवारी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस हा मराठी दिन म्हणून साजरा केला जातो.. तसेच रामानुजन यांचा जन्म दिवस गणित दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी जीवन व कार्याचा आढावा घेतला जातो. त्यांच्या आयुष्यातील विविध प्रसंगांच्या आधारे शाळा, महाविद्यालयात निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा इत्यादी स्पर्धांचे आयोजन केले जाते. त्यानिमित्ताने विद्यार्थी त्या महापुरुषांच्या आयुष्यातील विविध घटना आणि कार्य या विषयाची माहिती घेण्याचा प्रयत्न करतात. एकूणच त्या महापुरुषांच्या जीवन व कार्याची उजळणी होते त्या निमित्ताने त्यांच्यावरील पुस्तकांचे वाचन केले जाते.लोकशाहीर काॅ. अण्णा भाऊ साठे फक्त एकच दिवस शाळेत गेले होते. परंतु त्यांनी मराठी साहित्य, सांस्कृतिक क्षेत्रात आपल्या क्रांतिकारी लिखाणाने इतिहास घडवला.” दलित साहित्या”चा पाया रचण्यात काॅ. अण्णा भाऊ साठे यांचे मोलाचे योगदान होते. त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही लेखन केले.कथा,कादंबरी,नाटक, पोवाडा लावण्या,चित्रपट पटकथा लेखन या क्षेत्रात त्यांनी मनसोक्त मुशाफिरी केली.काॅ.अण्णा भाऊ साठे यांनी कलावंत म्हणून लोकनाट्य, नाटक, चित्रपटातून उत्कृष्ट भूमिकाही केल्या होत्या,ते अष्टपैलू साहित्यिक,कलावंत होते.”इंडियन पिपल्स थियेटर असोसिएशन “(इप्टा),या सुप्रसिद्ध पुरोगामी नाट्य संस्थेचे ते अखिल भारतीय अध्यक्षही होते.त्याकाळात त्यांच्या सोबत सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ.होमी भाभा,सूप्रसिध्द नाट्य सिने कलावंत बलराज सहानी आदी. कार्य करीत असत.काॅ.अण्णा भाऊ साठे फक्त केवळ लेखक, कलावंत नव्हते, तर ते प्रत्यक्ष येथील दलित-शोषित, कामगार, शेतकर्यांच्या शोषण मुक्तीच्या चळवळीत, स्वातंत्र्य चळवळीत संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये, गोवा मुक्ती आंदोलनत सक्रिय सहभागी होते,तुरूंगवासही भोगला होता.कम्युनिस्ट पक्षाच्या ” लाल बावटा कला पथका” द्वारे काॅ. अण्णा भाऊ साठे शाहीर काॅ. अमर शेख,शाहीर काॅ.दत्ता गव्हाणकर यांच्या मदतीने त्यांनी आपल्या गाणी, पोवाडे,लोकनाट्यातून महाराष्ट्रच नव्हे तर देश ढवळून काढला व प्रचंड जन जागृती करून मोठे योगदान दिले. महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील विविध विद्यापीठातील तरूण संशोधक आज अण्णा भाऊंच्या साहित्य,कर्तृत्वावर अभ्यास,संशोधन करीत आहेत. अण्णा भाऊ साठे यांच्या हयातीतच त्यांच्या साहित्याचे, पोवाड्यांचे भारतातील विविध भाषांत अनुवाद झालेत. एवढेच नव्हे तर इंग्रजी, रशियन,झेक,पोलीश,जर्मन,फ्रेंच आदी. भाषांतही अनुवाद होऊन ते जगभर गेले आहे. सातासमुद्रा पार अण्णाभाऊ आपल्या साहित्याने तळपत आहेत.असे असतानाही प्रस्थापित हिंदू जात-वर्गिय व्यवस्थेचे समर्थक आणि ब्राम्हणी- भांडवली साहित्य संस्कृतीच्या ठेकेदारांनी, तळागाळातील दलित-शोषित समाजातून आलेल्या काॅ. अण्णा भाऊ साठे यांची जिवंत असताना तर उपेक्षा केलीच, परंतु मृत्यूनंतरही व त्यांचे २०२० हे जन्म शताब्दी वर्ष सरल्या नंतरही, ही उपेक्षा आजतागायत चालू आहे.फुले,
शाहू,आंबेडकरांच्या नावाचा सतत घोष करणाऱ्या महाराष्ट्र राज्यासाठी आणि साहित्य- संस्कृती क्षेत्रासाठी ही अत्यंत लांच्छनास्पद गोष्ट आहे. महाराष्ट्र राज्याने आणि साहित्य क्षेत्राने अण्णा भाऊंच्या उपकारातून उतरायी होण्यासाठी १ऑगस्ट हा त्यांचा जन्मदिवस देशभर लेखन प्रेरणा दिन म्हणून शाळा,महाविद्यालयांमध्ये साजरा करावा, असे आम्हाला वाटत आहे.संपर्क: सुबोध मोरे (९८१९९९६०२९)
