केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचा विश्वास;मात्र न्यायालयाच्या निर्णयावर भाष्य करण्यास नकार
मालवण (प्रतिनिधी)
राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेना शिंदे गटाने जे निर्णय घेतले आहेत ते कायदेशीर सल्ला घेऊनच घेतले असल्याने राजकीय लढाईत शिंदे गटाचाच विजय होईल असा ठाम विश्वास केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त करतानाच शिंदे गटाच्या अपात्रतेबाबत शिवसेनेने दाखल केलेल्या याचिकेबाबत उद्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर अधिक भाष्य करण्याचे टाळले.
मालवण दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी निलरत्न निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला. राज्याच्या मंत्रिमंडळात सिंधुदुर्गच्या मंत्री पदाबाबतही ना. राणे यांनी भाजप नेत्यांनी नावे जाहीर केल्याशिवाय मी बोलणे हे पक्ष शिस्तीला धरून योग्य होणार नाही असे सांगून त्यावर अधिक बोलणे टाळले.
राज्यातील शिंदे सरकार सहा महिन्यात कोसळणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विधान केल्याबाबत पत्रकारांनी विचारले असता शरद देशमानेपवार हे कधीपासून भविष्य वर्तवायला लागले असा प्रश्न करीत ते म्हणाले, पवार यांच्या बोलण्याचा उलट अर्थ घ्यायचा असतो. राज्यातील शिंदे सरकार यापुढील अडीज वर्षे व त्यानंतर पाच वर्षे अशी एकूण साडे सात वर्षे निश्चित्तपणे सत्तेत राहील असेही ते म्हणाले.
आघाडी सरकार आल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात जी जी कामे बंद पडली आहेत, किंवा जी अपूर्ण राहिली आहेत ती सर्व कामे आणि प्रकल्प पूर्ण केले जातील, सीवर्ल्ड प्रकल्पही मार्गी लावला जाईल असे सांगून राणे म्हणाले, सिंधुदुर्गातील आजच्या पिढीतून जास्तीत जास्त उद्योजक बनविण्याचे काम आपण करणार असून आधुनिक टेक्नॉलॉजीसहित जे जे उपक्रम किंवा उद्योग आणता ते एक नाही तर अनेक उद्योग आपण आणू, असे ते म्हणाले. मालवणच्या विद्यमान आमदारांनी कोणती विकासकामे केली ती दाखवावीत, कॉन्ट्रॅक्ट घेणे हे एकमेव काम या आमदारांने केल्याची टीका ना. राणे यांनी केली.
