⚡बांदा ता.०९-: जिल्हा परिषद बांदा नं.1 केंद्र शाळेतील विद्यार्थ्यांची एक दिवस बळीराजासाठी या उपक्रमांतर्गत बांधावरच शाळा भरविण्यात आली. या दिवशी शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष बांधावर जाऊन शेतीकामाचा अनुभव घेतला.
भारत हा कृषीप्रधान देश असून शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय असून शेतकरी म्हणजेच बळीराजाबद्दल आदर निर्माण व्हावा ,शेती बद्दल आवड निर्माण व्हावी, शेतीचे महत्व समजावे, श्रम प्रतिष्ठा निर्माण व्हावी,शेतीच्या पारंपारिक व आधुनिक साधनांची ओळख व्हावी ,विविध किटकनाशके, बियाणांची ,खते व शेतीची तंत्रे यांचा परिचय व्हावा व शेतीची प्रत्यक्ष अनुभूती मिळावी यासाठी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
बांदा केंद्र शाळेच्या वतीने कृषी पंधरवडा निमित्ताने विद्यार्थ्यांना शेतावर नेऊन भात लागवडीचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले, यावेळी बांदा कृषी मंडळ अधिकारी पी.एस .घाटगे, कृषी सहाय्यक अतुल माळी , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मोरजकर, केंद्र प्रमुख संदीप गवस, प्रशांत गवस, अक्षय मयेकर, संकेत वेंगुर्लेकर, कोचरेकर शेतकरी कुटुंबीय आदी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना श्री पध्दतीने भात लागवड प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले.
हा उपक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी मुख्याध्यापक श्रीकांत आजगावकर, सरोज नाईक, उर्मिला मोर्ये, जे.डी.पाटील, रंगनाथ परब,प्रशांत पवार, रसिका मालवणकर, शुभेच्छा सावंत,जागृती धुरी,वंदना शितोळे,शितल गवस यांनी परिश्रम घेतले.विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबर निसर्गाचा सानिध्यात नेऊन प्रत्यक्ष शेतीचा अनुभव देण्याच्या या उपक्रमांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
