प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे रस्ता बंद झाल्यास आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल:मनसेतर्फे उपजिल्हाध्यक्ष अँड. अनिल केसरकर यांचा इशारा
⚡सावंतवाडी ता.२४-: प्रशासनाने सावंतवाडी मोती तलावतील गाळ काढण्याची पद्धत चुकीची असल्याने ज्या ठिकाणचा गाळ काढला होता, त्या ठिकाणचा संरक्षक कठडा कोसळल्याने भविष्यात मुख्य रस्त्याला देखील आता धोका निर्मा झाला आहे. भविष्यात प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे हा रस्ता बंद झाला तर आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा मनसेतर्फे माजी उपजिल्हाध्यक्ष अँड. अनिल केसरकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.
प्रसिद्धीपत्रकात अँड केसरकर म्हणाले, सावंतवाडी मोती तलावातील गाळ काढण्याची पद्धत पूर्णतः चुकीची असून त्यामुळे भविष्यात तलावाच्या संरक्षक भिंतीला धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती सर्वप्रथम मनसेने व्यक्त केली होती. डोजर रस्त्यावर ठेवून चालू असलेले गाळ काढण्याचे काम त्वरित बंद करण्यात यावे अशी मागणी मनसेमार्फत प्रशासनाकडे आम्ही केली होती. काम तात्काळ बंद करण्यात आले, मात्र ज्या ठिकाणचा गाळ काढला होता, त्या ठिकाणचा संरक्षक कठडा कमकवूत झाला होता व तो पावसात कोसळण्याची भीती होती ती खरी ठरली आहे.हा संरक्षक कठडा कोसळल्याने भविष्यात मुख्य रस्त्याला देखील आता भिती निर्माण झाली असून या वर सर्व प्रशासकीय यंत्रणांनी तात्काळ उपाययोजना करावी भविष्यात प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे हा रस्ता बंद झाला तर आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा मनसेतर्फे उपजिल्हाध्यक्ष केसरकर यांनी दिला.
