आमदार दीपक केसरकर यांची टीका; पैशाच्या अमिषाला बळी पडू नका…
*⚡सावंतवाडी ता.२९-:* सद्या संपूर्ण महाराष्ट्रात केवळ नितेश राणेंना जामीन मिळणार का? हीच चर्चा सुरू आहे. नितेश राणे यांनी यापूर्वी देखील असे अनेक प्रकार केले असून, प्रकरण अंगलट आल्यावर ते माफी मागतात अशी टीका आमदार दीपक केसरकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केली आहे.
यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की, नितेश राणे यांच्यावर करण्यात आलेली कारवाई ही पोलिसांनी केली असून, त्यांना भीती वाटत असल्यानेच त्यानी न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी संतोष परब यांना केवळ खरचटल आहे हे सांगणे चुकीचे असून, त्यांच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला आहे. यावेळी ते म्हणाले, नारायण राणे आणि माझ्यात कोणतेही वैर नसून, फक्त त्यांच्या मुलांच्या चुकीच्या वागणुकीमुळे बोलावं लागतं आहे. एका केंद्रीय मंत्र्यांनी अशा छोट्या निवडणुकीत सहभागी होणे चुकीचे आहे. परंतु, राजकीय वापरासाठी राणे यांना जिल्हा बँक हवी आहे. असा आरोप देखील त्यांनी केला आहे.
आजचा क्षण हा कसोटीचा असून, सहकार क्षेत्र जगणे महत्त्वाचे आहे. सतिश सावंत यांनी सहकार क्षेत्र वाढवले आहे. त्यामुळे पैशाच्या आमिशाला बळी न पडता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा असे आवाहन आमदार दीपक केसरकर यांनी मतदारांना केले आहे.
