शेतकरी राजा सुखावला;शेतीच्या कामांना वेग
*💫सावंतवाडी दि.११ विनय वाडकर-:* येथील शहरासह संपूर्ण तालुक्यात आज पावसाने झोडपून काढले असून, आज सकाळपासून सुरू झालेल्या पाऊस सायंकाळपर्यंत अविरत सुरूच आहे. या समाधानकारक पडलेल्या पावसामुळे पावसाच्या प्रतीक्षेत असलेला शेतकरी राजा मात्र चांगल्या पैकी सुखावला आहे. अविरत पडलेल्या पावसामुळे अनेक दिवस थांबलेल्या शेतीच्या अंतिम टप्प्यातील कामांना वेग येणार आहे. गेले पंधरा – वीस दिवस पावसाने पाठ फिरवल्याने शेत जमीन कोरड्या होत चालल्या होत्या. रात्रीच्या वेळेस रिमझिम पाऊस आणि दिवसाच्या वेळेस कडक ऊन असल्याने शेतकरी चिंतेत होते. लावणी केलेले भात पीक वाया जाऊ नये यासाठी ओहळ नदी यातील पाण्याचा उपसा करून पिकाला गेले पंधरा – वीस दिवस पाणी पुरविले जात होते. तर काही उंच भागाच्या ठिकाणी विहिरीतील पाणी पंपाच्या साहाय्याने उपसा करून पुरवले जात होते. ऐन शेती हंगामात पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी वर्ग हैराण झाला होता. कधी एकदा पाऊस पडून शिवार ओलेचिंब होते. या प्रतीक्षेत शेतकरी होता. आज सकाळ पासून या पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला आहे. पावसामुळे शेती कामांना आता अजून वेग येणार असून, शेतीची कामे आता अंतिम टप्प्यात सुरु आहेत. तर काही भागात भात लावणीची कामे पूर्ण झाली आहेत.
