परशुराम उपरकर यांचे टीका: नगरपालिका निवडणुकीत जनतेला दिलेले आश्वासन किती पूर्ण केली..?
⚡सावंतवाडी, ता. ०२-:
“जिल्ह्याचे पालकमंत्री हे केसरकरांपेक्षाही महाखोटारडे आहेत,” अशी घणाघाती टीका माजी आमदार परशुराम उपरकर यांनी आज येथे केली. निवडणुकीत जनतेला दिलेली आश्वासने कितपत पूर्ण केली, याचा हिशोब त्यांनी जनतेसमोर मांडावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
उपरकर म्हणाले की, “नगरपालिका आमच्या ताब्यात द्या आणि जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयांमधील डॉक्टरांची रिक्त पदे तात्काळ भरू,” असे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले होते. मात्र, जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेच्या सुधारणेबाबत अद्याप कोणती ठोस पावले उचलली गेली नाहीत. त्यामुळे त्यांनी याबाबत स्पष्ट उत्तर द्यावे.
ते पुढे म्हणाले की, जिल्ह्यात अनेक प्रश्न प्रलंबित असून पालकमंत्री केवळ श्रेय घेण्याचे काम करतात. प्रत्यक्षात केलेल्या कामांची माहिती मात्र जनतेसमोर मांडली जात नाही. सरकारी रुग्णालयांमध्ये डॉक्टरांची मोठी कमतरता असून अनेक पदे रिक्त आहेत. यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात हाल सहन करावे लागत आहेत.निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांचे काय झाले, असा सवाल ही उपरकर यांनी उपस्थित केला. दरम्यान जनतेला छाती ठोकपणे बांबोळीला जाण्याची गरज भासणार नाही,” असे सांगणाऱ्या पालकमंत्र्यांना हे आश्वासन पूर्ण करण्यात नेमका अडथळा काय आहे, असा प्रश्नही उपस्थित केला.
