⚡सावंतवाडी, ता. ९-: कोकणातील अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या तात्काळ हस्तक्षेपामुळे प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आले असून आवश्यक उपाययोजनांना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा युवा नेते विशाल परब यांनी तिन्ही नेत्यांचे आभार मानले आहेत.
विशाल परब यांनी बुधवारी मुंबई येथे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या समस्यांबाबत सविस्तर निवेदन सादर केले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री नितेश राणे यांनाही निवेदन देऊन तातडीने हस्तक्षेप करण्याची विनंती केली होती.
या निवेदनाची तात्काळ दखल घेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधित यंत्रणांना आवश्यक कार्यवाहीचे निर्देश दिले. त्यानुसार गुरुवारी सकाळी मुख्यमंत्री कार्यालय, पालकमंत्री नितेश राणे आणि सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांच्यात ऑनलाइन आढावा बैठक पार पडली. या बैठकीत अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेऊन विविध उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात आली. बैठकीनंतर प्रशासनाने तत्काळ कामाला सुरुवात करत मदतकार्य आणि अन्य आवश्यक उपाययोजनांना गती दिली.
जनतेच्या प्रश्नांसाठी केलेल्या पाठपुराव्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे समाधान व्यक्त करत भाजपा युवा नेते विशाल परब यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि विशेषतः पालकमंत्री नितेश राणे यांचे आभार मानले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी शासन संवेदनशीलपणे आणि तत्परतेने कार्यरत असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
