देवेंद्र फडणवीस आजपासून ३ दिवसांच्या कोकण दौऱ्यावर…

*💫मुंबई दि.१९-:*  तौक्ते चक्रीवादळाचा कोकणाला मोठा फटका बसला आहे. याच पार्श्वभूमिवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे पुढचे तीन दिवस कोकण दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती आहे. चक्रीवादळामुळे रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्गात भीषण परिस्थिती ओढावली आहे. याचा आढावा घेत मदतीची मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. गेल्या वर्षी निसर्ग चक्रीवादळाने मोठं नुकसान केलं होतं. त्यावेळी सरकारने केलेली मदत ही अपुरी होती पण आता तौक्ते चक्रीवादळानंतर नुकसानीचा अंदाज घेऊन राज्य सरकारने भक्कमपणे जनतेच्या पाठिशी उभे रहायला हवं अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. यासंबंधी त्यांनी ट्वीटही केलं आहे. तौक्ते चक्रीवादळाने रत्नागिरी तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यांना मोठा आर्थिक तडाखा दिला आहे. गरीब मच्छिमार, शेतकऱ्यांबरोबरच आंबा बागायतदार आणि फळ उत्पादकांनाही बसला असून घरे, मच्छिमार बोटी, गोठे जमीनदोस्त झाल्याने प्रचंड हानी झाली आहे. चक्रीवादळानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्याची परिस्थिती हळुहळू पूर्वपदावर येऊ लागली असून, आता नुकसानीचे आकडेही पुढे येऊ लागले आहेत. वादळामुळे आंबा, काजू, नारळ बागायतीचे अतोनात नुकसान झाले असून हा आकडा पाच कोटींच्या घरात जाण्याचा अंदाज सध्या वर्तवण्यात येत आहे. जसजसे पंचनामे होतील, तसतसे हे आकडे वाढत जाणार आहेत. सर्वाधिक फटका बसलेल्या देवगड तालुक्यामध्ये पाचशेहून अधिक घरे, गोठे व चार जिल्हा परिषद शाळांचे एकूण दीड कोटीहून अधिक नुकसान झाले आहे. तर १३२ विद्युत खांब व वाहिन्या तुटून २७ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. कलंबई केळयेवाडी तसेच विजयदुर्ग दशक्रोशीमध्येही अनेक गावांमध्ये तीन दिवस ग्राहकांना विजेविना रहावे लागले. अनेक गावांमध्ये खारबंधारा तुटून खारे पाणी शिरल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर हजारो हेक्टर शेतजमीन नापिक बनली आहे. मच्छिमारांच्या जाळ्यांचे, बोटींचेही प्रचंड नुकसान झाले आहे. वैभववाडी, कणकवली या सह्याद्रीच्या पायथ्याच्या तालुक्यातील गावांतील घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी मंगळवारी मालवणमधील वाड्यावस्त्यांना भेट देत, लवकरात लवकर नुकसानभरपाई देण्याची ग्वाही त्यांनी दिली.

You cannot copy content of this page