श्री देव रामेश्वर, छत्रपती शिवराय, भवानी माता ऐतिहासिक त्रैवार्षिक भेट सोहळा…

२३ ते २५ जानेवारीला आयोजन ; ऐतिहासिक सोहळ्यात भाविकांनी सहभागी व्हावे…

⚡मालवण,ता.१२-:
कोकणातील प्रसिद्ध देवस्थान कांदळगावचे ग्रामदैवत स्वयंभू श्री देव रामेश्वर आपल्या वारेसूत्र, तरंग व रयतेसह हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व महाराष्ट्राची कुलस्वामिनी आदिमाया भवानी माता यांच्या ऐतिहासिक पारंपरिक त्रैवार्षिक भेट सोहळ्यासाठी किल्ले सिंधुदुर्ग येथे २३ ते २५ जानेवारी २०२६ रोजी रवाना होणार आहेत. या ऐतिहासिक त्रैवार्षिक भेट सोहळ्यास भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन पारंपरिक शिवकालीन इतिहासाचे साक्षीदार व्हावे.असे आवाहन श्री देव रामेश्वर देवस्थान विश्वस्त मंडळाने केले आहे.

कांदळगाव श्री देव रामेश्वर मंदिरात देवस्थान ट्रस्ट व विश्वस्त मंडळ, मालवण व्यापारी, किल्ले सिंधुदुर्ग रहिवाशी, जोशी मांड, रामेश्वर मांड, महान, न्हिवे, कोळंब तसेच कांदळगाव रामेश्वर देवस्थानच्या मानकऱ्याची बैठक झाली. यावेळी किल्ले सिंधुदुर्गवर होणाऱ्या श्री देव रामेश्वर व शिवराय यांच्या त्रैवार्षिक भेट सोहळ्याबाबत नियोजन व चर्चा करण्यात आली.

यावेळी बैठकीत २३ जानेवारी ते २५ जानेवारी या कालावधीत श्री देव रामेश्वर आपल्या रयत लवाजम्यासह किल्ले सिंधुदुर्गवर छत्रपती शिवराय व आदिमाया कुलस्वामिनी भवानी मातेच्या त्रैवार्षिक भेटीसाठी जाणार असल्याचे ठरविण्यात आले. या पुढील नियोजन बैठक लवकरच घेण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

हिंदवी स्वराज्यस्थापनेस बळ मिळण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले सैनिकी आरमार मजबूत व भक्कम करण्याच्या दृष्टीने मालवण समुद्रातील कुरटे बेटावर भक्कम किल्ला उभारण्याचे ठरविले. सुमारे ४८ एकर परिसरात किल्ला बांधण्यासाठी त्यांनी मोरयाचा धोंडा येथे भूमिपूजन केले. त्यानंतर त्यांनी किल्ल्याच्या बांधकामास सुरुवात केली. त्यासाठी लागणारा काळा दगड कोल्हापूर येथून उंट, खेचर, घोडे यांच्या पाठीवरून वाहतूक करून आणण्यात आला. बांधकामाला चुना आणि शिसे यांचे मिश्रण लावण्याचे ठरले होते. दरम्यानच्या काळात कुरटे बेटावर बसविण्यात येणारा दगड समुद्राच्या लाटांपुढे टिकत नव्हता. यात अनेक दिवस लोटू लागले. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज चिंतातूर बनले. त्यावेळी छत्रपतींना दृष्टांत झाला. या दृष्टांतात कांदळगाव येथील श्री देव रामेश्वर छत्रपतींसमोर एका सत्पुरुषाच्या रुपात उभे राहून म्हणाले, राजे तुम्ही घाबरू नका, तुमची चिंता दूर होईल. पण, प्रथम तुम्ही एक गोष्ट करा, येथून जवळच उत्तरेच्या बाजूला माझे स्वयंभू शिवलिंग आहे. तेथे तुम्ही जा व त्याचा प्रथम जीर्णोद्धार करा. नंतर किल्ल्याच्या बांधकामास प्रारंभ करा. तुमची मनोकामना पूर्ण होईल, या दृष्टांताने छत्रपती जागे झाले. त्यांनी सरळ उत्तरेकडील कांदळगावचा मार्ग धरला. तेथे येऊन शिवलिंगाची पूजा-अर्चा केली व त्याठिकाणी एका दिवसातच आकर्षक घुमट उभारला. त्यानंतर छत्रपतींनी श्री देव रामेश्वराकडे किल्ला बांधून पूर्ण होऊ दे, असे साकडे घातले. त्याची आठवण म्हणून घुमटाच्या समोरच वटवृक्षाचे झाड लावले. आजही तो वटवृक्ष ‘छत्रपतींचा वड’ म्हणून दिमाखात उभा आहे. त्यानंतर किल्ल्याच्या बांधकामात दगड समुद्रात टिकू लागला आणि किल्ल्याचे बांधकाम पूर्णत्वास जाऊ लागले. यामुळेच हा भेट सोहळा आयोजित केला जात आहे.

श्री देव रामेश्वर सिंधुदुर्ग किल्ल्यावर गेल्यानंतर किल्ल्यावरील प्रमुख मानकरी सकपाळ कुटुंबिय यांच्याकडून स्वागत केले जाते. त्यानंतर छत्रपतींकडून शेले-पागोटे देऊन श्री देव रामेश्वराला नजराणा दिला जातो. याप्रसंगी सर्व वारेसुत्रांचाही सन्मान केला जातो. देव रामेश्वर आपल्यावतीने छत्रपतींना शेले-पागोटे देऊन सन्मानित करतात. नंतर देव रामेश्वर आपल्या वारेसुत्र व भवानी मातेसह किल्ल्यातील सर्व मंदिरांना भेट देऊन आशीर्वाद आदान-प्रदान करतात.
या ऐतिहासिक त्रैवार्षिक भेट सोहळ्यात कांदळगावातील सर्व मानकरी, ग्रामस्थ व तालुक्यातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी होतात. देव रामेश्वर जाणाऱ्या मार्गावर ठिकठिकाणी सडारांगोळी, तोरणे, स्वागत कमानी, आकर्षक देखावे साकारले जातात. हा भेट सोहळा म्हणजे मालवण तालुक्याच्या दृष्टीने एक सणच असतो. श्री देव रामेश्वर देवस्थान व परिसर देवालये विश्वस्त मंडळातर्फे सर्व भाविकांचे स्वागत करून या सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात येते. हा त्रैवार्षिक सोहळा यावर्षी २३ ते २५ जानेवारी २०२६ रोजी होणार आहे. या सोहळ्यात भाविक भक्तांनी सहभागी व्हावे असे आवाहन श्री देव रामेश्वर देवस्थान विश्वस्त मंडळाने केले आहे.

You cannot copy content of this page