रणरागिणी ताराराणी नाटकाचा होणार प्रयोग..
⚡मालवण ता.०७-:
मालवणच्या सागरातील ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्याचा ३५८ वा वर्धापन दिन किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समिती व राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १२ व १३ एप्रिल रोजी विविध कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. या कार्यक्रमांस सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहणार असून सिंधुदुर्ग किल्ल्यावर वास्तव्य करून स्वराज्याचा कारभार यशस्वीपणे सांभाळणाऱ्या महाराणी ताराराणी यांचा इतिहास सर्वांसमोर यावा या उद्देशाने ‘रणरागिणी ताराराणी’ या नाटकाचा मोफत प्रयोग दि. १३ रोजी सायंकाळी मालवणच्या मामा वारेरकर नाट्यगृहात होणार आहे, अशी माहिती किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समितीच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली.
मालवण मेढा राजकोट येथील श्री मौनीनाथ मंदिरात किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समितीची पत्रकार परिषद झाली. यावेळी समितीचे अध्यक्ष गुरुनाथ राणे, उपाध्यक्ष सौ. ज्योती तोरसकर, सचिव विजय केनवडेकर, सहसचिव गणेश कुशे, खजिनदार हेमंत वालकर, सदस्य भाऊ सामंत, प्रा. रामचंद्र काटकर, प्रदीप वेंगुर्लेकर, रविकिरण तोरसकर, रणरागिणी ताराराणी नाटकाचे दिग्दर्शक विजय राणे आदी उपस्थित होते.
यावेळी विजय केनवडेकर यांनी किल्ले सिंधुदुर्ग वर्धापन दिना निमित्त आयोजित कार्यक्रमांची माहिती दिली. हनुमान जयंती दिनी छत्रपती शिवाजी महाराज यांनी सिंधुदुर्ग किल्ल्यात गडप्रवेश केला. हा दिवस आम्ही गेली पंधरा वर्षी प्रेरणोत्सव म्हणून साजरा करतो. यावर्षी दि. १२ व १३ एप्रिल रोजी हा उत्सव साजरा करत आहोत. सिंधुदुर्ग किल्ल्याची पायाभरणी झालेल्या मोरयाचा धोंडा येथे १२ रोजी सकाळी ८ वाजता गणेश पूजन तसेच सागर पूजन करण्यात येईल. त्यानंतर ९ वाजता बंदर जेटी येथून सिंधुदुर्ग किल्ल्यावर रवाना होऊन किल्ल्यातील शिवराजेश्वर मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन होईल. त्यानंतर कोल्हापूर येथील न्यू छत्रपती ब्रिगेडचे मर्दानी खेळ सादर होऊन शिवरायांना मानवंदना देण्यात येईल. तसेच गेल्या वर्षभरात सिंधुदुर्ग किल्ल्यात स्वच्छता मोहीम राबविणाऱ्या सिंधुदुर्ग ऍडव्हेंचर, शिवप्रेमी सिंधुदुर्ग, सह्याद्री प्रतिष्ठान, दुर्ग मावळा प्रतिष्ठान या संस्थांचा सत्कार प्रेरणोत्सव समितीतर्फे करण्यात येणार आहे. तसेच १३ रोजी सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार हे सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट देऊन शिवराजेश्वर मंदिरात पूजन करणार असून त्यावेळी पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी आमदार प्रमोद जठार, जिल्हाधिकारी अनिल पाटील, पोलीस अधीक्षक सौरभ अगरवाल, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार वर्षा झाल्टे, पोलीस निरीक्षक प्रवीण जठार, नगरपालिका मुख्याधिकारी संतोष जिरगे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यानंतर सायंकाळी महाराष्ट्र शासनाकडून निश्चित करून देण्यात आलेले ‘रणरागिणी ताराराणी’ हे नाटक मालवणच्या मामा वरेरकर नाट्यगृहात मोफत सादर होणार आहे. तसेच नाट्यगृहच्या इमारतीमध्ये सुरु असलेल्या कला व आरामार दालनाच्या कामाची पाहणी मंत्री आशिष शेलार करणार आहेत. या सर्व कार्यक्रमासाठी जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांचे सहकार्य लाभले आहे, अशी माहिती केनवडेकर यांनी दिली.
यावेळी सौ. ज्योती तोरसकर म्हणाल्या, छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर स्वराज्याचा कारभार महाराणी ताराराणी यांनी सक्षमपणे सांभाळत शत्रूविरोधातही प्रखर लढा दिला. या दरम्यान ताराराणी यांनी सिंधुदुर्ग किल्ल्यात दोन वर्षे वास्तव्य करून कारभार चालविला. या इतिहासाची येथील लोकांना पुरेशी माहिती नाही. त्यामुळे ताराराणी यांचा हा इतिहास, त्यांचे कार्य समजावे या हेतूने या नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे मालवण वासियांनी हे नाटक अवश्य पहावे असे सौ. तोरसकर म्हणाल्या. तर विजय राणे यांनी मालवणसह जिल्हाभरात अन्य ठिकाणीही या नाटकाचे प्रयोग सादर होणार आहेत, असे सांगितले.
यावेळी अध्यक्ष गुरुनाथ राणे यांनी मालवण मामा वरेरकर नाट्यगृहाच्या इमारतीमध्ये सुरु असलेल्या कला व आरमार दालनाच्या कामाची माहिती दिली. कला व आरमार दालन व्हावे यासाठी गेली दहा वर्षे किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समिती पाठपुरावा करत होती. तत्कालीन पालकमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या सहकार्याने हे काम मंजूर होऊन प्रेरणो त्सव समिती, सार्वजनिक बांधकाम विभाग व मालवण नगरपरिषद यांच्या एकत्रित माध्यमातून हे काम होत आहे. या दालनातून मालवणचा शिवकाळातील इतिहास, आरमारी गलबते, किल्ले, याठिकाणी झालेली युद्धे, ऐतिहासिक वस्तू, कागदपत्रे, संस्कृती, चालीरीती, निसर्ग असे बरेच काही मांडण्यात येणार आहे. हे सर्व दृश्य स्वरूपात नागरिक व पर्यटकांना दाखविता येणार आहे, असे राणे यांनी सांगितले. तसेच मालवणच्या इतिहासाविषयी ज्यांच्याकडे साधने, कागदपत्रे, वस्तू, मौखिक साहित्य असल्यास त्यांनी प्रेरणोत्सव समितीशी संपर्क साधावा, अशा ऐतिहासिक वस्तूंचे जतन करण्यात येईल असे आवाहन ज्योती तोरसकर यांनी केले.
