वायरमनचा राजीनामा,लाईनमन रुग्णालयात अन साहेब नॉट रीचेबल…

वीजग्राहकांना वाली कोण : पाडलोस येथील गौरेश पटेकर यांचा सवाल..

⚡बांदा ता.०६-: आकाशात ढग दिसायला लागले की, महावितरण जागे होते. गेले 15 ते 20 दिवस पाडलोस गावात एकसारखा विजेचा लपंडाव सुरू आहे. वीज ग्राहक हैराण झाला आहे. वाढता उष्मा त्यात वीज वितरणची मान्सूनपूर्व कामे रखडलेली. पाडलोस येथे गुरुवारी सकाळ पासून 5 तास वीजपुरवठा खंडित असल्याने यंत्रणेशी संपर्क केल्यास कंत्राटी वायरमनचा राजीनामा, लाईनमन रुग्णालयात दाखल तर बांदा कनिष्ठ अभियंता नॉट रिचेबल असल्यामुळे वीज ग्राहकांना कोणी वालीच उरला नसल्याचे पाडलोस येथील सामाजिक कार्यकर्ते गौरेश पटेकर यांनी सांगितले.
श्री. पटेकर म्हणाले की, आकाशात ढग दिसले की लाईट बंद, गडगडात झाला की लाईट बंद, पाऊस सुरू झाला की लाईट बंद, ग्राहक जेव्हा विजेबद्दल महावितरण कर्मचाऱ्यांना विचारणा करतात तेव्हा नेहमीची कारणे असतात. आज लाईन फोल्ट आहे, आज झाड तोडतो, आज लाईट खांब बसवतो, आज लाईन साफ करतो, आज कंत्राटदाराची माणसे नाहीत, वरिष्ठ अधिकारी ऐकत नाहीत अशी विविध कारणे रोजरोज एकसारखी देतात. मात्र, प्रत्यक्षात काम करताना कुठेच दिसत नाही हे एक आश्चर्य असल्याचे श्री. पटेकर यांनी सांगितले.
जेव्हा वीज बिल थकीत असते तेव्हा वेळच्या वेळी अगदी वेळेवर हे कर्मचारी वसुलीसाठी येतात. वीज बिलाची मुदत संपली की रू.10/- प्रमाणे दंड करतात. मग तशी चोख सेवा का देत नाहीत अशी विचारणार सर्वसामान्य जनता करत आहे. अशा निष्क्रिय बेजबाबदार अधिकारी, कर्मचारी याच्यावर कायदेशीर कारवाई, अशी मागणी सर्वस्तरातून होत असल्याचे गौरेश पटेकर यांनी सांगितले. इतकं होऊनही जर महावितरण कंपनी, कर्मचारी अधिकारी यांना जाग येत नसेल तर सर्वसामान्य जनतेने करायचं काय, असा सवाल पटेकर यांनी सरकारकडे केला आहे.

दरम्यान, वीज वितरण अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.

फोटो—–
गौरेश पटेकर

You cannot copy content of this page