लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार:ग्रामस्थांचा इशारा..
⚡देवगड ता.२५-:
साळशी येथे जलजीवन मिशनअंतर्गत साळशी येथील नळयोजनेचे काम कार्यारंभ आदेश दि.१२ ऑक्टो २०२२ रोजी झालेला असून अद्याप हे अपूर्णावस्थेत आहे तसेच साळशी धनगरवाडी या अतिदुर्गम व डोंगराळ भागातील नागरिकांना तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असल्याने येथील ग्रामस्थांचे पिण्याच्या पाण्याच्या अभावी हाल होत आहेत. या साळशी नळपाणी योजनेचे काम तात्काळ सुरू करावे व पाणी टंचाईचे संकट दूर करावे अन्यथा देवगड पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्या कार्यालया समोर २ मे २०२४ रोजी उपोषणास बसण्याचा तसेच येत्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालित असल्याचा इशारा साळशी धनगरवाडी येथील ग्रामस्थांनी लेखी पत्राद्वारे गटविकास अधिकारी पंचायत समिती देवगड याना दिला आहे.ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग देवगड कडून साळशी धनगरवाडी नळयोजनेकरिता विहिरासाठी दिलेल्या जागेत पाणी लागले नाही असे कळविण्यात आले होते .त्या करीता भरपूर पाणी असलेल्या विहीरीच्या जागेचे बक्षिस पत्र झालेले आहे यावर योग्य ती कार्यवाही संबधीत विभाग मार्फत झालेली नाही.व कामाची सुरुवात ही झालेली नाही.
या अनुषंगाने गटविकास अधिकारी वृक्षाली यादव यांचे दालनात झालेल्या ग्रामस्थ व अधिकारी याचे चर्चेत यावर योग्य ती कार्यवाही करावी व नागरिकांची पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर व्हावी अशी सक्त सूचना संबंधीत प्रशासनास गटविकास अधिकारी यांनी दिली .
यावेळी ग्रा पा. पु.चे शाखा अभियंता श्री देशमुख,साळशी उपसरपंच कैलास गावकर,ग्रामस्थ रमेश खरात,सचिन खरात,बापू खरात,वनिता खरात,मनोहर खरात,प्रभाकर साळसकर,किशोर साळसकर,रुपेश गावकर,रंजना खरात ,रामचंद्र खरात उपस्थित होते.