विनायक राऊत:थापाड्या लोकांना घरी बसवण्यासाठी गावाच्या बाहेर हद्दपार करा..
⚡वेंगुर्ले ता.२३-: वेंगुर्ल्यातील चिपी विमानतळ स्वतः उद्योग मंत्री असताना नारायण राणे यांनी खाजगी ठेकेदाराला का दिल? ते एमआयडीसीच्या माध्यमातून का केलं नाही? तर विमानतळाच्या नावावर त्यांना ९३७ एकर जमीन सौभाग्यवतींच्या नावावर असलेल्या हॉटेलच्या नावे हडप करायची होती. आणि त्या एअरपोर्ट मध्ये ठेकेदाराबरोबर त्यांना पार्टनरशिप घ्यायची होती. २००५ मध्ये राडेबाज विकृती या वेंगुर्ल्यात आणायचं काम या राणेंनी केलं अशी जोरदार टीका खासदार विनायक राऊत यांनी वेंगुर्ले मठ येथील सभेत करत या थापाड्या लोकांना घरी बसवण्यासाठी गावाच्या बाहेर हद्दपार करून मशाली समोरील बटन दाबा असे आवाहन केले.
वेंगुर्ला तालुक्यातील आडेली जिल्हा परिषद मतदार संघातील स्वयंभू मंगल कार्यालय मठ येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रचार सभेत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे इंडिया आघाडीचे उमेदवार उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे खासदार विनायक राऊत बोलत होते. यावेळी त्यांनी भारतीय जनता पार्टी, महायुतीचे उमेदवार नारायण राणे व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरलर यांच्यावर जोरदार टीका केली.
यावेळी व्यासपीठावर यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, उबाठा शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, विधानसभा संपर्क प्रमुख शैलेश परब, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कोकण विभाग संघटक अर्चना घारे-परब, काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, महिला जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी, आम आदमी पार्टी जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर, उबाठा शिवसेना महिला जिल्हा संघटिका जान्हवी सावंत, जिल्हा समन्वयक चंद्रकांत उर्फ बाळा गावडे, तालुका संघटक भालचंद्र चिपकर, तालुकाप्रमुख यशवंत परब, उपजिल्हाप्रमुख प्रकाश गडेकर, तालुका महिला संघटिका सुकन्या नरसुले, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष योगेश कुबल, ऍड जी.जी. टांककर, माजी नगराध्यक्ष संदेश निकम, सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघ अध्यक्ष रमण वायंगणकर, युवासेना तालुकाप्रमुख पंकज शिरसाट, विभागप्रमुख संदीप पेडणेकर, राष्ट्रवादी शरद पवार महिला तालुकाध्यक्ष दीपिका राणे, काँग्रेस महिला तालुका अध्यक्ष दीक्षा पालव, शहरप्रमुख अजित राऊळ, एसटी सेना प्रमुख संजय गावडे, मनोहर येरम आदी उपस्थित होते.
विनायक राऊत यांनी लोकसभेत कोकणातील अनेक प्रश्न मांडले, त्याठिकाणी सोडवूनही घेतले आणि त्यामुळे त्यांना संसद रत्न पुरस्कारही मिळाला. त्यामुळे आता मोदी सरकारला सत्तेत न आणता राऊत यांना संसदेत पाठवा असे आवाहन माजी राज्य मंत्री प्रविण भोसले यांनी केले तर ग्रामीण भागात ज्या ज्या ठिकाणी जातेय त्या त्या ठिकाणी विनायक राऊत यांना उत्तम प्रतिसाद मिळतोय. विरोधातील पदाधिकारी सुद्धा म्हणायला लागलेत की आमची सिट धोक्यात आहे. आपल्याला शेतकरी व सर्वसामान्य जनतेचे राज्य आणायचे आहे यासाठी विनायक राऊत यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन अर्चना घारे परब यांनी केले. स्वतःचे स्वार्थी राजकारण करण्याचे काम दीपक केसरकर करत आहेत. पुढे ते भाजपात जाणार हे निश्चित आहे. आता सामंत बंधूंना फसवले, पुढे शिंदेंच्या पाठीत सुद्धा खंजीर खुपसून भाजपात जातील. यामुळे आता विनायक राऊत यांच्या विजयाची तर नारायण राणे यांच्या पराजयची हॅट्रिक होणार असे यावेळी शैलेश परब यांनी सांगितले.
दीपक केसरकर यांच्यावर जोरदार टीका
दीपक केसरकर सत्तेची लाचारी तुमच्या देहामध्ये भरलेली आहे. शरद पवार, प्रवीण भोसले त्यानंतर उद्धव ठाकरे याना फसवलं आणि आता एकनाथ शिंदे यांच्या सुद्धा दाढीला हात लावून केसरकर देवेंद्र फडणवीस यांच्या तंबूत कधी पळाले हे त्या किरण सामंताना कळलच नाही.
व्हॅनिटी व्हॅन वरून दीपक केसरकरांची उडवली खिल्ली
ग्रामीण भागातील तळागाळात जर जायचं झालं तर दीपक केसरकर तुमची व्हॅनल्टिव्ह जाईल का? केसरकर यांची कीव वाटते, या मतदार संघावर तुमचा अधिकार आहे असा तुम्ही उल्लेख करता आणि मतदारसंघातील एकही घर तुम्हाला आराम करायला, भाकरी खायला, विश्रांती घ्यायला मिळत नाही हे दुर्दैव आहे. आणि म्हणून त्यांनी व्हॅनिटी व्हॅन घेतली.
