वैभव नाईक ;गुजरात्यांनी व्यवसाय पुरते मर्यादित रहावे..
⚡कणकवली ता.२३-: केवळ मतांच्या राजकारणासाठी भाजप पक्ष आणि नारायण राणे हे गुजराती लोकांना जिल्ह्याच्या राजकारणात आणून स्थानिक कोकणी मराठी माणसाचे भविष्य उद्धवस्त करण्याचा प्रयत्न करीत आहेत अशी टीका आमदार वैभव नाईक यांनी केली. श्री.नाईक म्हणाले, नारायण राणेंनी यांनी गुजराती बांधवांसमवेत बैठक घेतल्याचे त्यांनी सोशल मीडियावर जाहीर केले.
भाजप पक्ष महाराष्ट्रात स्थानिक मराठी माणसाला डावलून गुजरात्यांना पुढे आणण्याचा प्रयत्न करत आहे. हे अनेकवेळा सिद्ध झाले आहे. सुरुवातीला व्यवसायात आणि आता राजकरणात देखील गुजराती लोकांचा शिरकाव भाजप करीत आहे. मुंबईत भाजपचे ३ खासदार गुजराती आहेत. परप्रांतीय लोकांमुळे मराठी माणूस मुंबईतून हद्दपार होत चालला आहे. आता मुंबई नंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात व्यवसाय क्षेत्रात गुजराती लोक आले असून भाजपकडून सुरुवातीला गुजराती लोकांची संघटना तयार करून आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नारायण राणेंनी गुजराती बांधवांसमवेत बैठक घेतली आहे. ते म्हणाले, मराठी माणसाच्या पुढील पिढीच्या उज्वल भविष्यासाठी भाजपला रोखणे गरजेचे आहे. त्यामुळे कोकणी मराठी माणूस भाजपचा आणि राणेंचा हा डाव हाणून पाडेल. तसेच गुजराती बांधवांनी व्यवसायापुरतेच मर्यादित रहावे स्थानिक लोकांशी वैर घेऊ नये असा सल्लाही आ. वैभव नाईक यांनी दिला आहे.
