मंत्री केसरकर यांच्या प्रयत्नाने प्रकल्प लागत आहे मार्गी:माजी आ शंकर कांबळी यांचा आरोप..
वेंगुर्ले (प्रतिनिधी)-
गेली 26 वर्षे रखडलेला ताज हॉटेलचा प्रकल्प नामदार दीपक केसरकर यांच्या प्रयत्नाने मार्गी लागत असून त्यामध्ये काही लोक व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करीत आहेत असा आरोप भूमिपुत्र संघाचे सल्लागार माजी आमदार शंकर कांबळी यांनी व्यक्त केला आहे.
दि. 4 एप्रिल पासून भूमिपुत्र संघाने खाजगी सर्वेअरामार्फत सदर जमिनीचा सर्वे सुरू केला आहे. त्याची पाहणी करण्यासाठी सदर खाजगी सर्वेच्या लोकांसोबत भूमिपुत्र संघाचे सदस्य व लिंगेश्वर देवस्थानचे अध्यक्ष जगन्नाथ डोंगरे व प्रकल्प होण्यासाठी अथक प्रयत्न करणारे त्यांचे बंधू मंगेश डोंगरे चर्चा करीत असताना त्या ठिकाणी त्या भागातील एक उन्मत व्यक्ती राजू आंदुर्लेकर याने तेथे डोंगरे बंधुना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली व मंगेश डोंगरे यांना मारहाण केली. हा सर्व प्रकार त्यांच्यासोबत असणाऱ्या इतर व्यक्तीने पाहिला व आंदुर्लेकर यास रोखले व मारहाण थांबवली. त्यानंतर श्री. आंदुर्लेकर याने, डोंगरे बंधूंना या भागात पुन्हा येण्याचा प्रयत्न करु नका, आल्यास हात पाय तोडण्याची धमकी दिली.
“चोराच्या उलट्या बोंबा” या म्हणीप्रमाणे त्याने अनेक राजकीय पुढार्यांना बोलावून घेतले व आपल्यालाच मारहाण झाल्याचा खोटा कांगावा सुरू केला. राजकीय पुढार्यांच्या, श्री. आंदुर्लेकर यांचा खोटेपणा लक्षात आल्यावर त्यांनी प्रकरण मिळण्यास सुरुवात केली व त्याप्रमाणे पोलीस स्थानकात प्रकरण मिटवले.
पण ज्या लोकांच्या जमिनी सदर ताज प्रकल्पाला गेलेल्या आहेत. त्या लोकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या भूमिपुत्र संघाने, उन्मत व्यक्ती राजू आंदुर्लेकर याचे आव्हान स्वीकारले असून भविष्यात काही अनुचित घटना घडल्यास भूमिपुत्र संघ त्यास जबाबदार राहणार नाही. याची दखल त्या उन्मत्त व्यक्तीला पाठीशी घालणाऱ्या राजकीय पुढार्यांनी घ्यावी अशी भूमिका भूमिपुत्र संघाचे सल्लागार व माजी आमदार शंकर कांबळी यांनी व्यक्त केली आहे.
