मळगाव येथील वाचन मंदिरात १६ डिसेंबर रोजी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन…

⚡बांदा ता.२३-: मळगाव येथील (कै.) प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचनालयात शनिवार दिनांक १६ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता प्राथमिक व माध्यमिक गटांसाठी (कै.) डॉ. सौ. मालती खानोलकर स्मृती वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा सावंतवाडी, दोडामार्ग, कुडाळ, वेंगुर्ले या तालुक्यासाठी मर्यादित आहे.

पाचवी ते सातवी या गटासाठी ‘माझा आवडता छंद ‘, ‘आजी आजोबा आणि आम्ही’, ‘मोबाईलने बालपण हरवतेय’ हे विषय ठेवण्यात आले असून स्पर्धकाने कोणत्याही एका विषयावर ४ ते ५ मिनिटे बोलायचे आहे. आठवी ते दहावी गटासाठी ‘भारताची चंद्रभरारी’, ‘आजची जीवनशैली आणि आपले आरोग्य’, ‘नैसर्गिक आपत्तीचे वाढते प्रमाण धोक्याची घंटा’ हे विषय ठेवण्यात आले असून स्पर्धकाने कोणत्याही एका विषयावर ५ ते ६ मिनिटे बोलायचे आहे.
एका प्रशाळेतून जास्तीत जास्त ३ विद्यार्थ्यांना स्पर्धेत सहभागी घेता येणार आहे. प्रत्येक गटातील प्रथम तीन क्रमांक विजेत्यांना अनुक्रमे १०००, ७५०, ५०० रुपये रोख तसेच दोन उत्तेजनार्थ क्रमांकांना रोख २०० रुपये व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धकांना एसटीचा प्रवास खर्च देण्यात येणार आहे. स्पर्धकांनी १५ डिसेंबर पर्यंत ग्रंथपाल आनंद देवळी यांच्याकडे नावानोंदणी करण्याचे आवाहन वाचनालायचे अध्यक्ष हेमंत खानोलकर व कार्यवाह गुरुनाथ नार्वेकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page