शेकडो कलमे भस्मसात : सुमारे २० लाखांचे नुकसान
⚡बांदा ता.०३-: मडुरा – पाडलोस सीमेवरील कोळंब परिसरात शनिवारी दुपारी आंबा व काजू बागायतीला भीषण आग लागली. या आगीत शेकडो आंबा ब काजूची कलमे भस्मसात झाली आहे. आगीत सुमारे २० लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. महसूल व कृषी विभागाचा पंचनामा न झाल्याने नुकसानीचा नेमका आकडा प्राप्त झाला नाही. आग कशामुळे लागली याचे कारण समजू शकले नाही.
या आगीत शेतकरी ज्ञानेश पांडुरंग परब, जगन्नाथ महादेव परब, दत्ताराम राजाराम परब, संतोष सोमा परब, विलास गोविंद शेट्ये, सिद्धेश प्रभाकर नाईक, सुनील पांडुरंग परब, संदिप मोहन परब यांच्यासह अन्य शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. सायंकाळपर्यंत आगीवर विझविण्यात यश आलेले नव्हते.
आगीची माहिती तलाठी व्ही. एस. कविटकर, कृषी सहाय्यक पल्लवी सावंत यांना शेतकर्यांनी फोनवरुन दिली. तहसीलदार कार्यालयात सायंकाळी मिटींग असल्याने नुकसानीचा पंचनामा झालेला नाही. प्रशासनाने नुकसानीचा पंचनामा करुन भरपाई द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकर्यांनी केली आहे.
