रायगड केगाव येथे वॉटर एटीएम, पाणी स्वच्छता सयंत्र बसविले

शुद्ध पाण्यासाठी कोकण कला व शिक्षण विकास संस्थेचा उपक्रम

बांदा/प्रतिनिधी
दुष्काळी भागात जेवढा पाण्याचा बिकट प्रश्न आहे तेवढाच किंवा त्याहून अधिक प्रमाणात स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ही रायगड मधील काही गावात आहे. त्यापैकी एक केगाव गाव. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी कोकण कला व शिक्षण विकास संस्थेच्या माध्यमातून गावात वॉटर एटीएम आणि पाणी स्वच्छता सयंत्र बसविण्यात आले. यो योजनेचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.


ग्रामपंचायत स्तरावर वेगवेगळ्या उपाययोजना गावातील मंडळी करत असतात त्यातच सरपंच आणि ग्रामपंचायत कार्यकारिणीच्या पुढाकाराने ही समस्या कोकण संस्थेच्या टीमला कळवली आणि त्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी संस्थेने नाब समृद्धी या नाबार्डच्या संस्थेला साकडे घातले आणि गावाला स्वच्छ पाणी मिळवून देण्यासाठी आपल्या सीएसआर निधीतून या योजनेला मूर्त स्वरूप दिले.
गावचे सरपंच आशिष तांबोळी, उपसरपंच योगिता ठाकूर आणि ग्रामस्थांनी या कामात मोलाचे सहकार्य केले. शुभारंभ प्रसंगी नॅब समृद्धी फायनान्स लिमिटेडच्या मॅनेजिंग डायरेक्टर श्रीमती उषामणी पी. आणि नॅब समृद्धी फायनान्स लिमिटेडच्या व्हाईस प्रेसिडेंट श्रीमती आरती यांच्या हस्ते फित कापून लोकार्पण करण्यात आले.
अन्न वस्त्र निवारा या जशा मूलभूत गरजा आहेत तशाच पाणी ही सुद्धा मूलभूत गरज असून स्वच्छ पाणी सर्वाना मिळावा या दृष्टिकोनातून हा उपक्रम राबवल्याचे श्रीमती उषामणी यांनी यावेळी सांगितले. या प्रकल्पाच्या माध्यमातून गावातील २० हजाराहून अधिक लोकांना याचा लाभ होणार असून लोकांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होणार आहे.
या कार्यक्रमाला ग्रामसेवक रवींद्र म्हात्रे, कोकण संस्थेच्या प्रकल्प व्यवस्थापक प्रीती पांगे, सलीना बुटेलो, आजी – माजी सदस्य, आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून दयानंद कुबल यांनी आभार मानले.
फोटो :-
केगाव येथे वॉटर एटीएमच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थित असलेले मान्यवर.

You cannot copy content of this page