अनिल जाधव : कणकवलीत सम्यक साहित्य संसदेचा पुरस्कार वितरण सोहळा..
कणकवली : सम्यक साहित्य संसद ही संस्था नवोदित साहित्यिकांना प्रोत्साहन देण्याचे काम करीत आहे. संविधानिक मूल्यांवर संस्थेचे काम चालते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिगर्भ लढयाची प्रेरणा घेऊन सामाजिक व साहित्यिक क्षेत्रात योगदान देणाºयांचा सन्मान करीत आहे. जेनझी अंधभक्त नाही, तर व्यवस्थांना प्रश्न विचारणारी असून सत्य व असत्याची पारख करणारी आहे. देशातील विविध प्रश्न व समस्यांवर तरुण पिढीने आवाज उठवला पाहिजे, असे आवाहन सम्यक साहित्य संसद संस्थेचे अध्यक्ष इंजि. अनिल जाधव यांनी केले.
सम्यक साहित्य संसद सिंधुदुर्ग संस्थेचा पुरस्कार वितरण सोहळा येथील कणकवली महाविद्यालयाचा एचपीसीएल सभागृहात आयोजित केला होता. या प्रसंगी श्री. जाधव बोलत होते. यावेळी प्रा. सोमनाथ कदम, संस्थेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ तांबे, कार्यवाह राजेश कादम, ज्येष्ठ पत्रकार विनायक मिठबावकर, कवयित्री स्नेहा जाधव, सूर्यकांत कदम, विठ्ठल कदम, प्रतीक तांबे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी संस्थेतर्फे दिला जाणारा ज्येष्ठ कवी आबा शेवरे जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत, पत्रकार विनायक मिठबावकर तर उत्तम सर्वोत्तम राज्यस्तरीय काव्य पुरस्कार कवियत्री स्नेहा कदम यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. विनायक मिठबावकर म्हणाले, दलित हा जातीवाचक शब्द नाही तर दलित ही एक व्यवस्था आहे. दलितांच्या संघटना व कार्यकर्ते एकसंध नसल्यामुळे राजकीय पक्ष त्यांचा स्वत:च्या स्वार्थासाठी राजकीय फायदा करून घेतात, ही बाब खेदजनक आहे. सम्यक साहित्य संसद संस्थेने कवी आबा शेवरे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ आबा शेवरे जीवन गौरव पुरस्कार आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्याला दिल्याबद्दल याबद्दल मला संस्थेबद्दल अभिमान आणि कौतुकपण आहे. सध्या मानव हा अंकहारी व आत्मकेंद्रीत होत चालला आहे. त्यामुळे सामाजिक व्यवस्था कोलमडत चालली आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
स्नेहा कदम म्हणाल्या, सम्यक साहित्य संसदेने मला उत्तम पवार यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ उत्तम सर्वोत्मक राज्यस्तरीय पुरस्कार दिल्याबद्दल मी संस्थेची ऋणी आहे. या संस्थेने नवोदित कवी व कवयित्रींना प्रोत्साहन देण्याचे काम केले. या संस्थेने मला दिलेला पुरस्कार म्हणजे घरच्या मंडळींनी केलेला माझा सन्मान आहे. सोमनाथ कदम म्हणाले, फुले, शाहू, आंबेडकर हे त्रिशरण आहेत. आंबेडकर चळवळ व दलितांची जयभीम ही खरी ताकद आहे. सर्वसामान्य माणूस हा संविधानाच्या जोरदारवर कोणताही लढाई जिंकू शकतो. जेनझी ही देशाची खरी ताकद आहे. संविधानाच्या मार्गावर जेनझी चाल्यास देशात परिवर्तन घडल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी सूर्यकांत कदम, विठ्ठल कदम, प्रतीक तांबे यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमात संस्थेतर्फे साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. आरंभी संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश कदम यांनी केले. यावेळी संस्थेचे सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो
