सिंधूमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान आणि उपजिल्हा रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आयोजन
*💫सावंतवाडी दि२०-:* सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान व उपजिल्हा रुग्णालय, सावंतवाडी यांचे संयुक्त विद्यमाने ” *ताण तणाव – कारणे व उपाय”* या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यात उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या समुपदेशक सौ अदिती कशेळीकर यांनी मार्गदर्शन केले. निवडक निमंत्रितांसाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली. यात प्रामुख्याने डॉक्टर्स, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक हे सहभागी झाले होते. यावेळी…. बदलती जीवनशैली, वातावरण, स्पर्धात्मक कार्यपद्धती तसेच सध्याचा कोरोना महामारीचा कालावधी ई मुळे समाजात ताणतणाव, नैराश्य, भीती, असुरक्षितता अशा समस्यांनी समाज मन ग्रस्त होतांना दिसतं. याचा कुठेतरी मानसिकतेवर परिणाम होत असतो. शारीरिक समस्येसारखीच ही मानसिक समस्या आहे, तेवढीच महत्वाची आहे, त्यामुळे दूर्लक्षून चालणार नाही. स्वास्थ्य जीवन जगण्यासाठी, स्वस्थ समाज निर्मितीसाठी जसे शारीरिक आरोग्य महत्वाचे आहे, तसेच मानसिक आरोग्य देखील महत्वाचे आहे. म्हणूनच जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या स्वस्थ व्यक्तीच्या व्याख्येत, शारीरिक स्वास्थ्यासह मानसिक स्वास्थ्यालाही तेव्हढेच महत्त्व दिले गेले आहे, असे प्रतिपादन अदिती कशेळीकर यांनी केले. लहानांपासून तो वृध्दापर्यंत सर्वच जण काहीनाकाही ताण सहन करीत असतात, तणावात असतात. त्याची कारणे व त्यावर सहज सोपे उपाय उदाहरणासाहित सौ अदिती कशेळीकर यांनी समजावून सांगितले. वैयक्तिक, कौटुंबिक, कार्यालयीन, सामाजिक स्थितीतून निर्माण होणारे किंवा आपणच निर्माण केलेले तणाव कसे निवळावे ? या मानसिकतेतुन निर्माण झालेल्या समस्येवर शांतपणे पण तणावरहित विजय कसा मिळवावा ? ध्यान, योग, सकारात्मक विचार यांचा दैनंदिन जीवनातील उपयोग, या सर्व बाबींवर सविस्तर मार्गदर्शन केले. कोरोना काळात आपले व विशेषत्वाने जे बाहेर पडत नाहीत अशी मुले, घरातील जेष्ठ यांची मानसिकता कशी उत्तमरीत्या सांभाळावी ? याविषयावर देखील चर्चा घेतली. या कार्यशाळेचा समारोप प्रश्नोत्तरांनी झाला. कार्यशाळेनंतर वैयक्तिक समस्येवर सुद्धा अनेकांना सौ कशेळीकर यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेत सहभागी नागरिकांनी झालेल्या मार्गदर्शनाबाबत व आयोजनाबाबत समाधान व्यक्त केले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सौ प्रेशा सापळे यांनी भूषविले. सूत्रसंचालन श्री अँड्र्यू फर्नांडिस यांनी केले व आभार भार्गवराम शिरोडकर यांनी मानले.
