उपजिल्हाधिकारी रविंद्र मठपती
⚡सिंधुदुर्गनगरी ता.०९-: सामुहिक विवाह सोहळ्यात एखादा बालविवाह होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विवाह सोहळा करणाऱ्या यंत्रणांच्या जनजागृतीसाठी तसेच बाल विवाह प्रतिबंध अधिनियमाच्या प्रचार व प्रसिध्दीसाठी कार्यशाळांचे आयोजन करावे, असे निर्देश उपजिल्हाकारी रविंद्र मठपती यांनी दिले.
महिला व बाल विकास विभागाच्या जिल्हास्तरीय कृती दल तसेच जिल्हास्तरीय सर्वसमावेशक महिला जिल्हा सल्लागार समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. बैठकीला जिल्हा आरोग्य अधिकारी संदेश कांबळे,माविमचे जिल्हा समन्वयक नितीन काळे, पोलीस निरीक्षक एस.बी.गावडे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजश्री सामंत, बाल कल्याण समिती सदस्य ॲङ अरुण पणदूरकर, चाईल्ड लाईनच्या प्रियंका घाडी, समुपदेशक स्वाती पाटील, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी समन्वयक विश्वनाथ कांबळी आदी उपस्थित होते.
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सोमनाथ रसाळ यांनी विषय वाचन केले. उपजिल्हाधिकारी श्री. मठपती यांनी यावेळी सविस्तर आढावा घेतला. कोविड-19 मुळे पालक गमावलेल्या बालकांमध्ये एक पालक मयत बालके 316, दोन्ही पालक मयत बालके 18 तसेच विधवा महिला 972 आहेत. 18 बालकांना अनाथ प्रमाणपत्र प्रस्ताव कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे. दोन पालक गमावलेल्या बालकांचा ताबा देण्याबाबत एक लांजा व एक सिंधुदुर्ग शासकीय बालगृह येथे दाखल असून उर्वरीत बालके पालकांच्या ताब्यात आहेत. तसेच सर्व बालकांना 5 लक्ष मुदतठेव प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले आहे. 245 बालकांना बालन्याय निधी योजनेअंतर्गत लाभ देण्यात आला असून उर्वरीत 11 बालकांना लाभ देण्याबाबत कार्यवाही सुरु आहे.
उपजिल्हाधिकारी श्री. मठपती पुढे म्हणाले, अक्षयतृतिया दिवशी होणारे बालविवाह रोखण्यासाठी सर्वच यंत्रणांनी सतर्क रहावे. त्यासाठी जनजागृती कार्यशाळा यावर भर द्यावा. ग्रामसेवक हा सक्षम अधिकारी म्हणून शासनाने जाहीर केले आहे. बालविवाहाच्या अनुषंगाने सर्व यंत्रणांनी रोखण्यासाठी अग्रेसर रहावे.
• सोबत फोटो जोडला आहे.
00000
