⚡सावंतवाडी ता.२३-: महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्यावतीने आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य विकास कार्यक्रमांतर्गत वेर्ले येथे शेतकऱ्यांना विशेष मार्गदर्शन करण्यात आले.एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत येणाऱ्या विविध योजनांची सविस्तर माहिती तसेच सिंधुरत्न समृद्ध योजनेंतर्गत गट यांत्रिकीकरण, अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका, पिक विमा, महाडीबीटी, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग, मग्रारोहयो अंतर्गत फळबाग लागवड आदीविषयी सखोल मार्गदर्शन मंडळ कृषी अधिकारी पी. एस. घाडगे यांनी केले.
तसेच शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करून विविध योजनांचा लाभ घेण्याविषयी आवाहन करण्यात आले. तृणधान्याचे आहारातील महत्त्व व गरज याविषयी सविस्तर माहिती कृषीसहाय्यक मिलिंद निकम यांनी दिली. तसेच शेतकरी मासिक, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनांविषयी तसेच शेतकऱ्यांच्या मिळणाऱ्या उत्पन्नाला बाजारपेठ मिळविण्याबाबत प्रोत्साहनपर मार्गदर्शन कृषीसहाय्यक स्वप्निल शिर्के याने केले. यावेळी शेतकऱ्यांना शेतीविषयक विविध योजनांची माहिती दिल्याबद्दल सरपंच रुचिता राऊळ यानी कृषी विभागाचे आभार मानले. यावेळी माजी सरपंच सुभाष राऊळ, ग्रामपंचायत सदस्य ममता राऊळ, चंद्रभागा गोसावी, मनीषा राऊळ, स्नेहा राऊळ, पल्लवी राणे, गोविंद लिंगवत, विजय राऊळ, संदीप सावंत, लाडजी राऊळ, दिलीप राऊळ आदी शेतकरीवर्ग व महिला बचत गट मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन कृषी सहाय्यक सी. एल. राऊळ यांनी तर स्वागत व आभार शंकर राऊळ यांनी मानले.
