⚡कणकवली ता.२२-: विद्यार्थ्यांच्या जीवनातील बारावीची परीक्षा हा एक महत्त्वाचा टप्पा समजला जातो. पुढील उच्च शिक्षणातील प्रवेशासाठी हे वर्ष खुप महत्त्वाचे मानले जाते. यासाठी विद्यार्थी वर्षभर जिद्दीने व आत्मविश्वासपूर्वक अभ्यास करीत असतात. असे असले तरी बोर्डाची परीक्षा म्हटली की, विद्यार्थ्यांच्या मनात एक अकारण भिती निर्माण होते ती भिती दूर व्हावी, विद्यार्थ्यांना मानसिक आधार मिळावा, यासाठी शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन डॉ. राजश्री साळुंखे, सचिव जगन्नाथ वळंजू आणि सर्व संस्था पदाधिकारी यांच्या संकल्पनेतून घरोघरी विद्यार्थी भेटीचे नियोजन करण्यात आले.
कला, वाणिज्य, विज्ञान, व्यावसायिक अभ्यासक्रम शाखातील पूर्व परीक्षा व जादा सराव परीक्षा यामध्ये अनुक्रमे विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांची यासाठी निवड करण्यात आली. आणि इतर विद्यार्थ्यांचाही समावेश करण्यात आलेला आहे.
परीक्षेसाठी शुभेच्छा देणे, अभ्यासाचे नियोजन करणे, परीक्षेचे नियोजन करणे, वेळेचे नियोजन करणे, विद्यार्थ्याचे शंका समाधान करणे, त्यांना भावनिक आधार देणे, त्यांचा आत्मविश्वास वाढवणे, मनोधैर्य उंचावणे व पालकांशी संवाद साधणे हा उद्देश समोर ठेवण्यात आला. यासाठी कणकवली परिसर, हळवल, वागदे, हरकूळ, शिवडाव, रामगड, करूळ, वरवडे, नागवे, करंजे, फोंडा, नांदगांव, माईण, बेळणे, ओसरगाव, बोर्डवे, आंब्रड, जानवली, कलमठ, बिडवाडी, पिसेकामते, अशा विविध गावागावात विद्यार्थ्यांच्या घरी शिक्षक व शिक्षिकांनी भेटी देण्यात आल्या. यामध्ये कला, वाणिज्य, विज्ञान व व्यावसायिक अभ्यासक्रम शाखेतील विद्यार्थ्यांना भेटी दिल्या. विद्यार्थी-पालक शुभेच्छा भेट या नाविण्यपूर्ण संकल्पनेचे सर्वांनी स्वागत केले व विद्यार्थी-पालकांनी शिक्षण प्रसारक मंडळ व कणकवली महाविद्यालयाविषयी समाधान व्यक्त केले.
