कला, क्रीडा, शैक्षणिक आणि सांस्कृतिकतेला व्यासपीठ देण्याचे काम वेताळ प्रतिष्ठान नऊ वर्षे करीत आहे

जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी काढले गौरव उद्गार

⚡वेंगुर्ले ता.१२-: सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कला क्रीडा, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि गेल्या काही वर्षांमध्ये कोकणची लोकपरंपरा असणाऱ्या दशावतार या सर्वांना व्यासपीठ देण्याचे काम वेताळ प्रतिष्ठान सलग नऊ वर्ष करत आहे,अबाल वृद्धांना सामावून घेताना प्रतिष्ठानने सामाजिक भान जपलेले आहे.स्वच्छता, रक्तदान, शालेय उपक्रम, गडकिल्ल्यांचे संवर्धन, रुग्णांना मोफत रूग्णपयोगी साहित्य सेवा प्रदान करणे, युवकांना प्रशिक्षण वर्ग, क्रीडा स्पर्धा अशा अनेक क्षेत्रात काम करणारे वेताळ प्रतिष्ठान हे सिंधुदुर्गासाठी खऱ्या अर्थाने भूषण आहे असे गौवोद्गार अश्वमेध महोत्सव अंतर्गत स्पर्धात्मक उपक्रमांच्या बक्षिस वितरण समारंभ प्रसंगी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी काढले.

सलग पंधरा दिवस चाललेल्या या अश्वमेध महोत्सवाअंतर्गत अनेक स्पर्धा घेण्यात आल्या, तुळस महोत्सव अंतर्गत दशावतांर नाट्यमहोत्सवाला रसिक प्रेक्षकांची तोबा गर्दी होती, नाट्य महोत्सवाची सुरुवात दत्त माऊली दशावतार नाट्य मंडळ सिंधुदूर्ग यांनी ‘शेषाद्मज गणेश’ ,तर आजगावकर पारंपरिक दशावतार नाट्य मंडळ यांचा ‘त्रिवेणी संगम’ आणि देवेंद्र नाईक प्रस्तुत चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळ यांचा ‘गौरी स्वयंवर’ या नाटकांनी दशावतार नाट्य महोत्सवाची उंची वाढवण्याचे काम केले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शालेय मुलांना व्यासपीठ देण्यासाठी विविध स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या होत्या, त्या स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न झाला. उद्घाटन जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि गणेश पूजन करुन करण्यात आले. यावेळी व्यापीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष उद्योजक दादासाहेब परुळकर, प्रमुख अतिथी जिल्हा बँक संचालक विद्याधर परब, उद्योजक सुधीर झांटये, ग्रामपंचायत सदस्य जयंत तुळसकर, निलेश नागवेकर, उपसरपंच सचिन नाईक, ज्येष्ठ दशावतार श्रीधर मुळीक, प्रगतशील शेतकरी शरद धुरी,आदर्श शिक्षक झिलू घाडी व शिक्षिका लीना नाईक, सिंधु रक्तमित्र चे जिल्हाध्यक्ष प्रकाश तेंडोलकर, साहस प्रतिष्ठान च्या रुपाली पाटील, प्रतिष्ठान चे अध्यक्ष विवेक तिरोडकर, निवेदक काका सावंत, बी. टी. खडपकर, मंदार तुळसकर, प्रकाश परब, कृष्णा तावडे, सुजाता पडवळ आदी मान्यवर उस्थितीत होते.

यावेळी शालेय मुलांना व्यासपीठ देण्याच्या अनुषंगाने सांस्कृतिक महोत्सवामध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले, यामध्ये जिल्ह्यातील २५ हून अधिक शाळांनी सहभाग घेतला. हायस्कूल साठी आयोजित विवध स्पर्धा मधून सर्वोत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्याला ‘न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल उभादांडा’ ला मानाचा ‘श्री वेताळ करंडक’ मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.

You cannot copy content of this page