*💫बांदा दि.०५-:* थकीत वीज देयकांच्या वसुलीसाठी महावितरण कंपनीने वीज ग्राहकांना वीज कनेक्शन तोडण्याबाबत नोटिसा पाठविल्याने बांदा भाजपचे पदाधिकारी आक्रमक झाले. कोरोना काळात उपजीविकेसाठी धडपड करणाऱ्या गरीब जनतेवर हा अन्याय असून वीज कनेक्शन तोडण्याचा प्रयत्न झाल्यास कार्यालयात येऊन ‘ताला ठोको व हल्लाबोल आंदोलन’ करण्याचा इशारा लेखी निवेदनाद्वारे देण्यात आला. कोरोना कालावधीतील ६ महिन्यांची वीज बिले ग्राहकांना एकत्रित देण्यात आली आहेत. त्यातच वाढीव वीज बिले ग्राहकांच्या माथी मारण्यात आल्याने वीज देयके भरणे ग्राहकांना कठीण झाले आहे. महावितरण कंपनीने वीज देयकांच्या वसुलीसाठी ग्राहकांना नोटिसा बजाविण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये म्हटले आहे की, वीज देयके न भरल्यास कोणतीही पूर्वकल्पना न देता वीज कनेक्शन तोडण्यात येईल. यामुळे वीज ग्राहकात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना कालावधीत रोजगार, व्यवसाय, नोकरीवर परिणाम झाल्याने कमी कालावधीत पूर्ण देयके भरणे शक्य नसल्याचे जिल्हा बँक संचालक प्रमोद कामत यांनी सांगितले. त्यामुळे वीज ग्राहकांवर अन्यायी पद्धतीने कारवाई न करता बिलांबाबत सवलत देण्याचा विचार करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. महावितरणने वीज कनेक्शन तोडल्यास आपल्याशी संपर्क साधण्याचे आवाहन सरपंच अक्रम खान यांनी यावेळी केले. यावेळी महावितरणचे बांदा नंबर १ कार्यालयाचे सहाय्यक अभियंता सुभाष आपटेकर, बांदा नंबर २ कार्यालयाचे अभियंता श्री. यादव यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हा बँक संचालक प्रमोद कामत, सरपंच अक्रम खान, सभापती मानसी धुरी, उपसभापती शीतल राऊळ, भाजप बांदा मंडल अध्यक्ष महेश धुरी, जिल्हा परिषद सदस्य श्वेता कोरगावकर, माजी सरपंच मंदार कल्याणकर, सरचिटणीस दादू कविटकर, ग्रामपंचायत सदस्य मकरंद तोरसकर, किशोरी बांदेकर, महिला शहर अध्यक्ष अवंती पंडित, युवामोर्चा शहर अध्यक्ष साई सावंत, मधू देसाई, डेगवे उपसरपंच प्रवीण देसाई, ज्ञानेश्वर सावंत, सिद्धेश पावसकर, डेगवे सोसायटी चेअरमन राजन देसाई आदींसह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.सहाय्यक अभियंता सुभाष आपटेकर यांनी आपले म्हणणे वरिष्ठ कार्यालयात सादर करण्याचे आश्वासन दिले.
विजग्राहकांच्या समस्यांविरोधात बांद्यात भाजप आक्रमक….
