शिंदे गटाचे नेते राजेश क्षीरसागर यांचा आरोप
सिंधुदुर्गनगरी ता ०४
खासदार विनायक राऊत यांनी मातोश्रीवर जाऊन कान फुकण्याचे व दुसऱ्या बाबत गैरसमज पसरवण्याचे काम केले. त्यांना स्वतःला क्रेडिट घेण्याचे व्यसनच जडले आहे. त्यामुळे माझ्यासारख्या ३६ वर्षे शिवसेना वाढविण्यासाठी काम करणाऱ्या कडवट शिवसैनिकाला अन्य मार्ग शोधावा लागला. खासदार राऊत हे २०१९ च्या निवडणुकीत युतीच्या जोरावर निवडून आले. आता त्यांनी निवडून येऊन दाखवावे, ते पुढील २०२४ ला खासदार नसतील . असा टोला राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष तथा शिंदे गटाचे नेते राजेश क्षीरसागर यांनी आज पत्रकार परिषदेतून लगावला.
जिल्हा नियोजन बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना राजेश क्षीरसागर म्हणाले, मी प्रामाणिकपणे शिवसेना वाढविण्यासाठी तब्बल ३६ वर्षे मातोश्री शी एकनिष्ठ राहिलो. शिवसेनेसाठी मेहनत घेऊन काम केले. परंतु सर्व चांगल्या कामाचे श्रेय घेण्यासाठी खासदार विनायक राऊत हे नेहमी पुढे असायचे. माझ्या विरोधात कान भरण्याचे काम खासदार राऊत यांनी केले. गैरसमज पसरविला. विनायक राऊत यांना फुकाचे क्रेडिट घेण्याची व्यसन जडले आहे. त्यामुळे माझ्यासारख्या अनेक कडवट शिवसैनिकांना अन्य मार्ग शोधावा लागला. आमच्या सर्वांच्या मेहनतीच्या जोरावर आणि युतीच्या जोरावर २०१९ ची निवडणूक जिंकून येणाऱ्या खासदार विनायक राऊत यांनी २०२४ ची निवडणूक लढवून जिंकून दाखवावी., ते २०२४ मध्ये खासदार नसतील त्यासाठी गरज पडली तर त्यांच्या विरोधी प्रचार करण्यासाठी २०२४ च्या निवडणुकीत सिंधुदुर्गात येईन. असे यावेळी शिंदे गटाचे नेते राजेश क्षीरसागर यांनी आज ओरोस येथील शासकीय विश्रामगृह येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
- जिल्ह्याला गरज असल्यास अधिकचा निधी देऊ
सिंधुदुर्ग जिल्हा हा निसर्गरम्य पर्यटन जिल्हा आहे. येथे लाखो पर्यटक येतात. त्या दृष्टीने येथील विकास झाला पाहिजे, जिल्ह्यातील नदीचा गाळ काढणे हा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यासाठी जिल्ह्याचा आराखडा व्हावा. नाविन्यपूर्ण योजना मधून जिल्ह्यात शाश्वत मालमत्ता तयार झाली पाहिजे त्या दृष्टीने कामे सुचवली पाहिजेत, बाळासाहेब ठाकरे यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्मारक व्हावे, तीन महिन्यातून एकदा नियोजन सभा व्हावी, जिल्हा नियोजन साठी मिळणारा निधी चांगल्या कामांसाठी खर्च करून त्याचे फलित दिसले पाहिजे,आदि सूचना आपन आजच्या नियोजन समिति सभेत केल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात चांगली विकास कामे सुरू आहेत. पुढील काळातही हे सरकार चांगले काम करेल. अशी अपेक्षा आहे. जिल्ह्याला आवश्यक असलेला निधी वाढवून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल, परंतु निधी खर्चाचे नियोजन करण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी व संबंधित यंत्रणेचे आहे.त्यामुळे जिल्हा नियोजन कडे मिळणारा निधी १०० टक्के खर्च करण्याचे योग्य नियोजन करा, निधी कमी पडू देणार नाही. असे यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.
