पक्षश्रेष्ठी देतील ती जबाबदारी पेलणार

उद्योजक किरण सामंत यांनी केली भूमिका स्पष्ट

मालवण, दि प्रतिनिधी
आगामी काळात होऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायण राणे,शिक्षण मंत्री दीपक केसरकर,उद्योग मंत्री उदय सामंत , पालकमंत्री रवींद्र चव्हाण ही नेतेमंडळी जी जबाबदारी सोपवतील ती यशस्वीपणे पेलणार असल्याची माहिती उद्योजक किरण सामंत यांनी देतानाच जे बाळासाहेबाच्या शिवसेना पक्षात येण्यास इच्छुक आहेत त्यांचे स्वागतच आहे आमच्या पक्षात येण्यासाठी दबावतंत्र टाकण्याची आम्हाला गरज वाटत नाही असा टोलाही त्यांनी खासदार विनायक राऊत यांच्या वक्तव्यावर पत्रकारांशी बोलताना लगावला

दरम्यान येत्या २० ऑक्टोबरला वायरी येथील आर. जी. चव्हाण मंगल कार्यालयात बाळासाहेबांच्या शिवसेनेचा होणारा मेळावा भव्यदिव्य स्वरूपात होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मालवण दौऱ्यावर आलेले राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांचे बंधू आणि उद्योजक श्री. सामंत यांनी आज सागरी महामार्ग येथील हॉटेल रामेश्वर येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी महेश राणे, बबन शिंदे, राजा गावकर, उल्हास तांडेल,विश्वास गावकर, अरुण तोडणकर, डॉ.सदाशिव राऊळ यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

पत्रकारांशी संवाद साधताना श्री सामंत यांनी मालवण वायरी येथे २० ऑक्टोबर रोजी होणाऱ्या बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या मेळाव्याच्या नियोजनासाठी आणि आढावा घेण्यासाठी आपण आल्याचे स्पष्ट करीत ते म्हणाले, खासदारकीच्या निवडणुकीसाठी आपल्या नावाची चर्चा आहे. मात्र पक्ष संघटना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायण राणे शिक्षण मंत्री दीपक केसरकर,उद्योग मंत्री उदय सामंत , पालकमंत्री रवींद्र चव्हाण ही नेतेमंडळी जी जबाबदारी सोपवतील ती पार पाडणार आहे. येत्या काळात बाळासाहेबांची शिवसेना पक्ष संघटना वाढविण्यावर आपला भर राहणार आहे. आज अनेक जण पक्षात येण्यास इच्छुक असून त्या सर्वांना सोबत घेत लवकरच कार्यकारिणी जाहीर केली जाणार आहे.

आम वैभव नाईक ,राजन साळवी यांच्यावर सीबीआय, ईडी यांचा दबाव टाकला तरी ते बळी पडणार नाहीत या खासदार विनायक राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावर श्री. सामंत यांचे पत्रकारांनी लक्ष वेधले असता ते म्हणाले, जे बाळासाहेबाच्या शिवसेना पक्षात येण्यास इच्छुक आहेत त्यांचे स्वागतच आहे आमच्या पक्षात येण्यासाठी दबावतंत्र टाकण्याची आम्हाला गरज वाटत नाही असा टोला लगावला

आजच्या दौऱ्यात सर्वसामान्यांच्या विकासाचे, रोजगाराचे अनेक प्रश्न असल्याचे दिसून आले आहेत. या समस्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे मांडून त्या दूर करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. अडीज वर्षांपूर्वी महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर अगोदरच्या सरकारच्या अनेक निर्णायाला महाविकास आघाडीने स्थगिती दिली होती मात्र त्या निर्णायाची चौकशी झाल्यानंतर काही योग्य निर्णयावरील स्थगिती महाविकास आघाडी सरकारने उठविली होती त्यामुळे आताच्या सरकारने महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयांना स्थगिती दिली असली तरी त्यातील जी कामे योग्य आहेत त्या कामांची स्थगिती उठविली जाणार असल्याचे सांगितले तर सी-वर्ल्ड प्रकल्पाबाबत अभ्यास करून त्याबाबत पक्षाची काय भूमिका असेल ते स्पष्ट करू. जिल्हा नियोजनची न झालेली सभा पालकमंत्री रवींद्र चव्हाण हे लवकरच घेतील असे त्यांनी सांगितले.
मालवण किनारपट्टी ही शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे २० तारखेला शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत होणारा मेळावा भव्यदिव्य होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे श्री. सामंत यांनी यावेळी स्पष्ट केले.

फोटो – मालवण दौऱ्यावर आलेल्या उद्योजक किरण सामंत यांचे बबन शिंदे यांनी स्वागत केले.

You cannot copy content of this page