⚡सिंधुदुर्गनगरी दि.२१-: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंमलबजावणीसाठी 20 हजार प्रति महिना मानधनावर केवळ कंत्राटी स्वरुपात तात्पुर्त्या कालावधीसाठी आय टी असिस्टंट या पदांची बाह्यस्थ पद्धतीने सेतू समितीमार्फत भरती करण्यात येणार आहे. 22 जुलै ते 29 जुलै सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत इच्छुकांनी अर्ज सादर करावेत असे आवाहन जिल्हा सेतू समितीच्यावतीने करण्यात आले आहे.
यापदासाठी कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण, मुलभूत संगणक कौशल्यासह एमएस-सीआयटी प्रमाणपत्र किंवा समकक्ष अर्हता आवश्यक आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, सामान्य शाखेत नियुक्तीचे ठिकाण असेल. 30 गुणांची तोंडी मुलाखत असणार आहे. या पदाकरिता विहित नमुन्यातील अर्ज जिल्हाधिकारी कार्यालय, सामान्य शाखा येथे 500 रुपये भरून उपलब्ध होतील. 1 ऑगस्ट रोजी अर्ज छाननी, 2 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजलेपासून पात्र उमेदवारांची तोंडी मुलाखत आणि 3 ऑगस्ट रोजी गुणवत्ते नुसार पात्र उमेदवारांची निवड यादी प्रसिद्ध केली जाईल.
एखाद्या उमेदवाराने / अर्जदाराने त्याची निवड करण्यासाठी निवड समितीवरील अध्यक्ष, सदस्य तसेच अधिकाऱ्यांवर प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष राजकीय अथवा अन्य प्रकारे दबाव अणल्यास अथवा गैरप्रकारचा अवलंब केल्यास त्यास निवड प्रक्रियेतून अपात्र ठरवण्यात येईल. अर्जामध्ये नमुद केलेली तसेच अर्जासोबत दिलेली माहिती अथवा प्रमाणपत्रे चुकीची अथवा खोटी अढळून आल्यास संबंधित उमेदवार दंडात्मक कारवाईस पात्र राहील. तसेच चुकीच्या माहितीच्या अधारे निवड झाली असल्याचे नंतर आढळून आल्यास संबंधित उमेदवारास तात्काळ कमी करण्यात येईल. संबंधित उमेदवार भारतीय दंड संहितेचे कलम 199, 200 (2) अन्वये शिक्षेस पात्र राहील.
जाहिरातीमध्ये दिलेल्या सूचनांचा तसेच उक्त नमुद अटी व शर्तीमध्ये कोणताही बदल करणे किंवा भरती प्रक्रिया रद्द करणे याबाबतचे सर्व अधिकार जिल्हा सेतू समितीचे अध्यक्ष यांनी राखून ठेवलेले आहेत, असेही प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
