आजगांव साहित्य प्रेरणा कट्ट्याची विसावी बैठक संपन्न

⚡सावंतवाडी ता.२८-: आजगांव येथील ‘साहित्य प्रेरणा’ कट्टयाची वीसावी मासिक बैठक नुकतीच आजगांव ग्रंथालयाच्या सभागृहात संपन्न झाली. यावेळी निवृत्त शिक्षक आत्माराम बागलकर यांच्या हस्ते श्रीफळ व पुस्तक भेट देऊन साहित्य संगम या वाडमयीन व्यासपीठाचे अध्यक्ष तथा तोरसे, गोवा येथील शासकीय विद्यालयाचे अध्यापक सुभाष शेटगांवकर यांचे स्वागत करण्यात आले.

या मासिक बैठकीत मांद्रे (गोवा) येथील साहित्य संगम या वाडमयीन व्यासपीठाचे अध्यक्ष तथा तोरसे, गोवा येथील शासकीय विद्यालयाचे अध्यापक सुभाष शेटगांवकर यानी कै. रणजीत देसाई यांच्या संगीत ‘हे बंध रेशमाचे’ या नाटकावर विवेचन केले आपल्या अभ्यासपूर्ण विवेचनात शेटगांवकर यानी प्रारंभी नाटकाची पार्श्वभूमी सांगून नाटकातील पात्रांचा सविस्तर परिचय केला. त्यानंतर त्यानी नाटकातील महत्वपूर्ण प्रसंग कथन करून संपूर्ण नाटकाचे कथानक सूत्ररुपाने उपस्थित रसिकांसमोर सादर केले शेवटी कवयित्री शांताबाई शेळके यानी लिहिलेल्या या नाटकातील पदांचाही त्यानी आढावा घेतला.

कु. मुग्धा विनय सौदागर हिने या नाटकातील ‘विकल मन आज असहाय्य… हे पद आपल्या सुरेल आवाजात सादर केले. बैठकीच्या प्रारंभी कट्टयाचे समन्वयक कवि विनय सौदागर यानी स्वागत व प्रास्ताविक करून वक्त्यांचा परिचय केला. विनय सौदागर यानी शेवटी ऋणनिर्देश केला.

बैठकीस मांद्रे (गोवा) येथील ‘साहित्य संगम’चे कार्यवाह प्राचार्य गजानन मांद्रेकर, डॉ. सुधाकर ठाकूर, डॉ. मधुकर घारपुरे, विनय फाटक, अनिल निखार्गे, उत्तम भागीत, ईश्वर थडके, दत्तगुरू कांबळी, विनायक उमर्ये, एकनाथ शेटकर, विशाल उगवेकर, प्रकाश वराडकर, चंद्रकांत गवंडे, सोमा गावडे, मीरा ठाकूर, अनिता सौदागर व प्रिया आजगावकर हे साहित्यिक व साहित्यप्रेमी उपस्थित होते.

You cannot copy content of this page