मालवण दि प्रतिनिधी आंबेरी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील चव्हाटा-आंबेरी रस्त्याची दुर्दशा झाली आहे. संबंधित कार्यालय व मक्तेदारांनी या रस्त्याबाबत दखल न घेतल्याने १ एप्रिल रोजी आंबेरी ग्रामस्थांनी कुडाळ येथील प्रधानमंत्री ग्रामसडक योजना सिंधुदुर्ग विभाग यांच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसण्याचा निर्णय घेतला आहे.
आंबेरी ग्रामस्थांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, चव्हाटा-आंबेरी रस्ता प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून २०१९ साली मंजूर झालेला असून या रस्त्याचे काम पूर्ण करण्याचा कालावधी ६ मार्च २०२० होता. तरीही अद्याप काम पूर्ण झालेले नाही. २०१९ पासून रस्त्याचे काम सुरू झाल्यापासून वाहतुकीस बंद करण्यात आला होता. सद्यस्थितीत रस्त्याचे खडीकरण झाल्यानंतरही रस्त्यावर बऱ्याच मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून दगड आणि धुळीत वाहने चालवावी लागत आहे. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे.
