राज्य शासनाने शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे; तुळस येथील बागायतदार शेतकऱ्यांची निवेदनाद्वारे मागणी
वेंगुर्ला प्रतिनिधी-वेळोवेळी बदलत्या हवामानामुळे व अवकाळी पावसामुळे आंबा – काजू बागायतदार मेटाकुटीस आलेला आहे. शेतक-यांना आत्महत्येशिवाय पर्याय उरलेला नाही. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व महाविकास आघाडी सरकार यांनी या सर्व गोष्टींचा गांभीर्याने विचार करून शेतक-यांना कर्जमुक्त करावे,अशी मागणी वेंगुर्ला तालुक्यातील तुळस येथील आंबा-काजू बागायतदार शेतकरी यांच्यावतीने रोजी वेंगुर्ला तहयिलदार यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी महसूल नायब तहसीलदार लक्ष्मण फोवकांडे यांनी हे निवेदन स्वीकारले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २०१७ मध्ये शासनाच्या महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१५ ते २०१९ या काळातील शेतक-यांना रुपये २ लाखापर्यंत थकीत कर्ज माफ झालेले आहे. परंतु २ लाख रुपये वरील कर्जमाफी मिळालेली नाही. थकबाकीदार कर्जमाफीपासून अजूनही वंचित राहिलेले आहेत. त्यांना अजूनही माफी मिळाली नाही. सातबारा कोरा करणार अशी घोषणा करून अजूनही २ लाखांवरील शेतकरी हे शासनाकडून २ लाखावरील माफी मिळेल या प्रतिक्षेत आहेत. थकीत कर्जदार शेतक-यांच्या वर जप्तीच्या नोटिसा देऊन त्यांचे कर्ज व्याजासहित कर्ज वसुली सुरु केली, ही बाब अत्यंत खेदजनक व संतापजनक आहे. एखादी योजना जाहीर केल्यावर त्यांची अंमलबजावणी करण्याची कुवत या शासनाची नाही असेच दिसून येत आहे व महत्त्वाची बाब म्हणजे अजूनही शेतकरी २ लाखांवरील व्याजासहीत संस्था पातळीवर मोठ्या प्रमाणात थकबाकीदार राहिलेले आहेत. त्यांचा त्रास शेतक-यांना सहन करावा लागत आहे. नैसर्गिक आपत्तीने व कोव्हिड १९ ने त्रस्त झालेल्या शेतक-यांना विमाद्वारे नुकसानभरपाई देण्याचे ठरले. त्यानुसार विमा कंपनीकडे ज्या शेतक-यांचे २८ हजार रुपये जमा झाले. त्यांना विमा कंपनीने काही भागात १८ हजार ८०० रुपये दिले व विमा कंपनीने १९ कोटी रुपये नफा मिळविण्याचा धंदा केला ही वस्तुस्थिती आहे. तरी वरील सर्व विषयांचा शासनाने गांभीर्याने विचार करून शेतक-यांना कर्ज २ लाखांवरील तसेच खावटी कर्जाचा व नियमित भरणा-यांचे ५० हजार रुपये या प्रत्येक गोष्टींचे शेतक-यांना आश्वासन दिले आहे. त्यामुळे शेतक-यांना शासनाकडून आशेचा किरण दिसून येत आहे. त्यामुळे वेळोवेळी बदलत्या हवामानामुळे व अवकाळी पावसामुळे आंबा – काजू बागायतदार मेटाकुटीस आलेला आहे. मुख्यमंत्री व महाविकास आघाडी सरकार यांनी या सर्व गोष्टींचा गांभीर्याने विचार करून शेतक-यांना कर्जमुक्त करावे अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी आंबा काजू बागायतदार शेतकरी नारायण गावडे, माजी ग्रा.पं. सदस्य शामसुंदर राय, प्रदीप सावंत, उत्तम नाईक, काजू बागायतदार रमाकांत पेडणेकर आदी उपस्थित होते. या निवेदनावर विठ्ठल आरोसकर, यशवंत सावंत, कृष्णा राऊळ, गंगाराम परब, दत्तात्रय मराठे, महेश परब, सुनिल परब, भिकाजी सावंत, पुरुषोत्तम भणगे, रामचंद्र आरावंदेकर, यशवंत सावंत, रामचंद्र परब, चंद्रकांत परब, श्री जैतिराश्रित विविध सहकारी सोसायटी तुळस चे व्हाईस चेअरमन संतोष शेटकर आदी आंबा – काजू बागायतदार शेतकरी यांच्या सह्या आहेत.
