आंगणेवाडी यात्रेसाठी येणाऱ्या व्यापाऱ्यांवर निर्बंध घालून पालकमंत्र्यांनी त्यांची रोजी रोटी हीरावण्याचा घातला घाट

सुदेश आचरेकर यांची टीका

मालवण ता.२१-:* आंगणेवाडी येथील भराडी देवीच्या जत्रेचा सत्ताधारी पालकमंत्री, आमदार, खासदार यांना विसर पडला असून जत्रा नियोजनाची बैठक दरवर्षी आंगणेवाडीत होत असताना पालकमंत्री उदय सामंत यांनी आंगणेवाडीत येण्याचे सौजन्य न दाखवता ही बैठक कुडाळ येथे घेऊन दरवर्षीची प्रथा मोडली आहे.

जिल्हाधिकारी व आंगणेवाडी ग्रामस्थांनी जत्रेचे योग्य नियोजन केले असताना पालकमंत्री यांनी व्यापाऱ्यांच्या स्टॉलवर निर्बंध लादून त्यांची रोजी रोटी हिरावून घेण्याचा घाट घातला आहे, अशी टीका करत जत्रेवर घातलेले निर्बंध शिथिल झाले पाहिजेत, अशी मागणी मालवणचे माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी पत्रकार परिषदेत केली. मालवण येथील भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत सुदेश आचरेकर हे बोलत होते. यावेळी सभापती अजिंक्य पाताडे, माजी नगरसेवक दीपक पाटकर, आबा हडकर, ललित चव्हाण आदी उपस्थित होते. यावेळी सुदेश आचरेकर म्हणाले, आंगणेवाडी जत्रेसाठी राज्यासह देशभरातून भाविक येत असतात. या जत्रेचे नियोजन दरवर्षी आंगणेवाडी येथेच आयोजित करून जत्रेच्या तयारीची पाहणी करून माहिती घेऊन नियोजन केले जाते.

मात्र यावर्षी पालकमंत्री उदय सामंत यांनी ही नियोजन बैठक कुडाळ येथे घेऊन ही प्रथा मोडीत काढली आहे. कोरोना मुळे गतवर्षी जत्रा झाली नाही. यावर्षी जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग कमी झाला असल्याने यापूर्वी जिल्हाधिकारी यांनी आंगणेवाडीत बैठक घेतली. कार्यतत्पर, कार्यक्षम व शिस्तप्रिय असणाऱ्या जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी आंगणे ग्रामस्थांसमवेत जत्रेचे शिस्तबद्ध असे नियोजन केले. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी पालकमंत्री, खासदार, आमदार यांना मात्र जत्रेचा विसर पडलेला दिसतो. पालकमंत्री सामंत यांनी कुडाळ मध्ये नियोजन बैठक घेऊन या नियोजनाला खो घालून जत्रेवर निर्बंध लादत जत्रेत २५ टक्के स्टॉल उभारण्याचीच परवानगी दिली.

अनेक छोटे मोठे व्यापारी, व्यावसायिक जत्रेत स्टॉल उभारण्यासाठी वर्षभर तयारी करतात. जत्रेत त्यांची वर्षभराची कमाई होते. मात्र स्टॉल उभारणीवर निर्बंध आणून पालकमंत्री व्यापाऱ्यांना उध्वस्त करत आहे. व्यापाऱ्यांची रोजी रोटी हिरावण्याचा हा घाट असून जत्रेत स्टॉल उभारलें गेल्यास व्यापाऱ्यांवर आत्महत्येची वेळ येणार आहे. व्यापाऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानीस पालकमंत्री, खासदार, आमदार हे जबाबदार राहणार आहेत. त्यामुळे जत्रेवरील निर्बंध शिथिल करून व्यापाऱ्यांना स्टॉल लावण्यास परवानगी देण्यात यावी अशी आमची मागणी असून यासाठी भराडी देवीने सत्ताधाऱ्यांना सुबुद्धी देवो, असेही यावेळी आचरेकर म्हणाले.

यावेळी सभापती अजिंक्य पाताडे म्हणाले, आंगणेवाडी जत्रेच्या नियोजन बैठकीस तालुक्याचे सभापती, त्या गावचे सरपंच व अन्य लोकप्रतिनिधी यांना बोलविणे आवश्यक असते. मात्र पालकमंत्र्यांनी नियोजन बैठक कुडाळ येथे घेऊन बैठकीस सभापती म्हणून आपणास तसेच आंगणेवाडी गावचे सरपंच यांना कोणतेही आमंत्रण दिले नाही. जत्रा ज्या ठिकाणी होतेय तेथील स्थानिक लोकप्रतिनिधींना न बोलविता दुसऱ्याच ठिकाणी नियोजन बैठक कशी घेतली जाते ? असा सवाल पाताडे यांनी उपस्थित केला. तसेच कोरोना प्रतिबंधक लसचे दोन डोस घेतलेल्या व्यक्तींनाच जत्रेत प्रवेश देण्याची जी अट लादण्यात आली आहे, त्यासाठी जत्रा स्थळी कोणते नियोजन करण्यात आले आहे ? असा सवालही पाताडे यांनी उपस्थित केला.

You cannot copy content of this page