*⚡मालवण ता.०७-: वडाचापाट येथील श्री देवी शांतादुर्गा हायस्कूलमध्ये ‘जिजाऊ ते सावित्री- सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा’ या अभियानांतर्गत “मासिक पाळी व्यवस्थापन”या विषयावर उद्बोधन वर्ग व चर्चासत्र संपन्न झाले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या लाभलेल्या मानसोपचार तज्ज्ञ डॉ. दीप्ती खोत यांनी या चर्चासत्रामध्ये विद्यार्थिनींना मासिक पाळी म्हणजे काय? त्या संदर्भात घ्यावयाची स्वच्छता व काळजी तसेच आहार व मानसिक बदल याविषयी उद्बोधन केले.
किशोरवयीन मुलींच्या मनामध्ये येणारे विचार व आकर्षण नैसर्गिक असून मनावर ताबा ठेवणे आपल्याच हातात असते असे सांगत मुलींनी जीवनामध्ये निर्णय कसे घ्यावे याचे मार्गदर्शन केले. या चर्चासत्रात विद्यार्थिनींनी देखील त्यांना प्रतिसाद देत आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. सौ.प्रीती सनये यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. सूत्रसंचालन सौ.वेदिका दळवी यांनी तर आभार कु. प्रतिभा केळुसकर यांनी मानले. या कार्यक्रमासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.
