युवक काँग्रेसतर्फे काँग्रेस स्थापना दिनानिमित्त शेतकरी सन्मान….

*💫मालवण दि२८-:* राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या २८ डिसेंबर या स्थापना दिनाच्या निमित्ताने युवक काँग्रेसच्या वतीने कुणकवळे येथे शेत बांधावर जाऊन श्री. तानाजी सावंत या शेतकरी दांपत्याचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी पक्षाच्या वतीने संपूर्ण देशात माझा तिरंगा अभियान राबविण्यात येत असल्याने शेतकरी कुटुंबाचा सन्मान करताना तिरंगा झेंडा देखील पदाधिकारी यांनी अभिमानाने हृदयाशी धरला. यावेळी श्री तानाजी सावंत दांपत्याचा युवक काँग्रेस विधानसभा मतदार संघ उपाध्यक्षा पल्लवी तारी यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. सध्या केंद्रातील भाजप सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या न्याय हक्का पासून वंचित ठेवण्यात येत असून सध्याच्या वातावरणात बदल व नैसर्गिक संकटे आल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी देखील हवालदिल झाले आहेत. भात शेती, आंबा, नारळ, सुपारी बागायत यांना देखील नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे. मोहोर घळून गेला असून शेतकरी आर्थिक संकटाला सामोरे जात आहे. याबाबत लवकरच ग्रामपंचायत स्तरावर पीक पंचनामा यादी तयार झाली की नाही याबाबत देखील आढावा युवक काँग्रेसच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे, असे यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा काँग्रेसचे सचिव बाळू अंधारी, ज्येष्ठ कार्यकर्ते बाबी कुणकावळेकर, युवक जिल्हाध्यक्ष देवानंद लुडबे, जिल्हा युवक प्रवक्ता अरविंद मोंडकर, जिल्हा युवक सचिव योगेश्वर कुरले, युवक तालुकाध्यक्ष अमृत राऊळ, सन्मानमूर्ती शेतकरी श्री. तानाजी सावंत व सौ. सावंत, कुणकवळे येथील नागरिक कल्पना पाटकर, शुभांगी बांदेकर, आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page